Wednesday, June 29, 2016
के दिल अभी भरा नही..
“अभी ना जाओ छोडकर ...के दिल अभी भरा नही...” निर्जराचे सख्खे शेजारी, देशपांडे काका चप्पल घालता घालता छान गुणगुणत होते. लिफ्ट कडे जाता जाता ते सहज तिच्या घरात डोकावले. “काय निर्जरा , आलीस होय ऑफिस मधून?” काकांनी सहज चौकशी केली. रोज करतात तशीच.. तिनेही हि हसून उत्तर दिले. “हे काय आत्ताच आले. पण तुम्ही पार्टी बिर्टी ला चाललात कि काय? इतके छान तयार होऊन निघालात म्हणून विचारलं!” तिने हि नेहमीसारखं विचारलं. “छे गं ! पार्टी बिर्टी काही नाही. ते नवीन नाटक आलय ना ‘दिल अभी भरा नही’ ते बघायला जातोय मित्रांबरोबर. राघव ने मस्त पहिल्या रांगेतली तिकिटं अधून आणलीयेत आमच्यासाठी आणि फार आग्रह केला कि आजोबा, हे नाटक बघाच एकदा, म्हणून जातोय गं, तेवढाच विरंगुळा!” आजोबा म्हणाले आणि पटकन गेले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा आजोबांचा इतका सळसळता उत्साह पाहून तिलाच छान वाटलं. ती आत वळणार इतक्यात निर्जराचा नवरा रेयांश आला आणि घरात शिरता शिरता म्हणाला, “ ह्या देशपांडे आजोबांची पण कमाल आहे हा! ऐंशी वर्षाचे झाले पण म्हणे ‘दिल अभी भरा नही’ . अजून चाललेत नाटकं बघायला सूट बूट घालून! “ “अरे तुला काय करायचंय? जाउदे ना त्यांना! तू जा फ्रेश हो आणि चल चहा घे! ” निर्जरा वैतागून म्हणाली. ती दार लावणार इतक्यात तिला देशपांडे आजी दिसल्या.. डोळ्यात पाणी होते त्यांच्या! “बहुतेक रेयांशचं बोलणं ऐकलं त्यांनी! आता उद्या समजूत काढावी लागेल आजींची! ह्या रेयांशला कळतच नाही कुठे काय बोलावं ते! काय गरज होती असं बोलायची? “ असा विचार निर्जरा करत होती आणि आजींना बघून कसंनुस हसून तिने दार लावून घेतलं.
दुसर्या दिवशी संध्याकाळी निर्जरा जरा लवकरच आली. आली ते आजींशी बोलायचं हा निर्धार करूनच! तिने छान चहा केला आणि आजींना हाक मारली. तिला माहित होतं, संध्याकाळच्या वेळी अर्धा पाऊण तास एकट्याच असतात. “आजी येता का चहा घ्यायला? तेवढीच मला कंपनी मिळेल. नाहीतरी रेयांश आज उशिरा येणार आहे.” चहाच्या निमित्ताने निर्जराने आजींना घरी बोलावले. “आले हं! जरा देवाला दिवा लाऊन येते!” आजी येते म्हणाल्या तेव्हा निर्जराचा जीव भांड्यात पडला. कालच्या प्रकाराने आजी रागावल्या तर नसतील ना अशी तिच्या मनात धाकधूक होती. आजी तश्या प्रेमळ होत्या आणि निर्जराला सुद्धा कोणालाही दुखावणे आवडत नसे. म्हणून झाला प्रकार त्यांनी फार मनाला लावून घेतला नसावा असे निर्जराला वाटले. निर्जरा ने दोन कपांमध्ये चहा ओतला , जोडीला छान बिस्किटं प्लेट मध्ये रचून ठेवली तेवढ्यात आजी आल्याच.
दोघी एकत्र डायनिंग टेबल वर बसून चहा घेऊ लागल्या. “छान झालाय हं चहा..बरं झालं बाई तू आज चहाला बोलावलंस ते.. नाहीतर ही संध्याकाळ ची वेळ अगदी नकोशी वाटते ग घरात एकटीला. घरात सगळं छान असूनसुद्धा हे कातरवेळ हुरहूर लावते बघ जीवाला.” आजी म्हणाल्या. “आजी, हेही तुमचच घर आहे. या कि रोज चहाला. मलाही छान वाटेल.” निर्जरा म्हणाली. “आजी ..एक विचारू का? काल रेयांश जे आजोबांविषयी बोलला ते ऐकून तुम्हाला वाईट वाटलं असेल ना! खरं तर त्याच साठी मी आज तुम्हाला त्याच्या वतीने सॉरी म्हणायला म्हणून मुद्दामच बोलावले. त्याच्या मनात तसं काहीच नव्हत हो! आपला सहज परिणामांचा विचार न करता बोलून गेला तो! माफ करा आजी त्याला! मला माहितेय तुम्हाला खूप वाईट वाटले असणार. पण तरी तुमचा नातू समजून त्याला माफ करा.” निर्जरा कळकळीने बोलली. “निर्जरा अगं इतकी माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही.. मला जसा राघव तसाच रेयांश. तू वाईट वाटून घेऊ नकोस. काल रेयांश चे बोलणे ऐकून मला वाईट वाटले होते पण ते तेवढ्यापुरतेच. नंतर मी तो विषयच सोडून दिला.. अगं तुम्हा तरुण मुलांच्या मनात हे येणेही अगदी साहजिक आहे कि संपूर्ण आयुष्य गेल्यावर आता म्हातारपणी कशाला बाहेर फिरायचं? नाहीतरी आपल्याकडे पूर्वीपासून अशीच मानासिकता आहे की म्हातारपणी आपापल्या खोलीत बसावं ,जगापासून अलिप्त राहावं आणि मरणाची वाट बघत हरी हरी करावं. पण ज्याच्यावर वेळ येते ना, त्यांच्यासाठी हे खूप कठीण असतं गं!” आजी पोटतिडकीने मन मोकळं करत होत्या आणि निर्जरा मन लावून आजींचे बोलणे ऐकत होती.
“अगं आम्ही सुद्धा आधी ह्याच मानसिकतेचे होतो. एका विशिष्ट वयानंतर सणासुदीला नवीन कपडे घेणं , बाहेर येण जाणं कमी केलं होतं , सगळ्यातून अलिप्त राहू असच ठरवलं होतं. अरुण आणि कल्याणी अगदी प्रेमाने आमचं सगळं करत होते . आम्हाला हवं नको ते सगळं छान बघतात ती दोघं, नातवंड म्हणजे तर अगदी आमचे जणू मित्रच होते नि आहेत. तरी आमच्यासाठी त्यांनी आपापली कामे का सोडायची? त्यांनाही त्यांचं आयुष्य आहेच कि! मुलं आपापल्या व्यापात असतात नि मोठ्या शहरात नोकरीच्या ठिकाणाहून परत यायलाही उशीर होतो. अशावेळी संध्याकाळची वेळ अगदी आम्हाला दोघांना नको वाटायची. हुरहूर लागायची जीवाला. हे तर अगदी खचल्यासारखे दिसायचे आणि माझ्या डोळ्यात का कुणास ठावूक पाणी यायचं. शेवटी आमच्या मुलांनाच आमचं हे अलिप्त वागणं आणि आमची मानसिक अवस्था बघवली नाही आणि एक दिवस त्यांनी आम्हाला समोर बसवून विचारलच कि त्यांचं काही चुकतंय का ! आम्हाला का इतका त्रास होतोय! आम्हालाही कारण कळेना गं! आणि त्यांनी आमचं कौन्सिलिंग का काय म्हणतात तेच केलं! आणि आम्हा दोघांनाही त्यांचं बोलणं पटलं कि म्हातारे झालो म्हणून सकारात्मक राहणं का सोडायचं? छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणं का बंद करायचं? ह्या वयाला हे शोभत नाही, ते करणं चांगलं दिसतं का ह्या समाजाच्या बंधनात का अडकवून घ्यायचं स्वतःला? कशासाठी म्हातारपणाला शाप समजून नकारात्मक विचारात मृत्यूची वाट बघत दिवस ढकलायचे? उलट देवाने इतकं छान बोनस आयुष्य दिलाय ते आनंदात जगायचं. छान आवडी निवडी , छंद जोपासायचे! नवीन पिढीशी, त्यांच्या तंत्रज्ञानाशी ओळख करून घ्यायची, त्यांच्यात सामील व्हायचं म्हणजे सकारात्मकता वाढायला मदत होते. सूर्यास्ताची जर हुरहूर वाटते तर त्या सुर्यास्ताच्याच वेळी छान आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ व्यतीत केला तर कशाला हुरहूर वाटेल? हो कि नाही? म्हणूनच संध्याकाळी हे त्यांच्या मित्रांच्यात वेळ घालवतात आणि आनंदी राहत्तात आणि ह्यांना असं उत्साही बघून मीही मुला सुनांच्या आवडीचे पदार्थ करण्यात वेळ घालवते. थोडं वाचन करते, मनाला वाटेल ते करते. बरोबर कि नाही? बघ बोलत काय बसले मी! आज मस्त शेवपुरी करणार आहे घरी, त्याची तयारी करायची आहे. आमच्या कल्याणीला फार आवडते .तुलाही आवडत असेल ना? झाली कि हाक मारते हो तुलाही..चल येते मी.” असं म्हणत आजी उठल्या. “हो आजी ..नक्की हाक मारा मला.. मी येईन मस्त शेवपुरी एन्जॉय करायला! “ निर्जरा म्हणाली. तिला आजी आजोबांचे त्यांच्या सकारात्मकतेबद्दल खूप कौतुक वाटत होते आणि आजी रागावल्या नाहीत हे ऐकून हायसे आणि मोकळेही वाटत होते.
वैदेही राजे- जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Very touching. Totally agree!!
ReplyDeleteLove the positive attitude of the story!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGoshtitil sahajta ani sakaratmakta khup aavadli!
ReplyDeleteGoshtitil sahajta ani sakaratmakta khup aavadli!
ReplyDelete