Thursday, September 8, 2016

रुणुझुणुत्या पाखरा...

रुणुझुणूत्या पाखरा , जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिम्बलोण करा... माझं माहेर सावली, उभी दारात माउलि तिच्या काळजात बाई माया - ममतेचा झरा .. आज सकाळपासून मनात सारख हेच गाण वाजतय! लग्न झाल्यापासून दर वर्षी आमच्या कडच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले कि मला वेध लागतात ते माहेरच्या महालक्ष्म्यांचे ... दर वर्षी आई बाबा सांगतात "आम्ही महालक्ष्म्यांना जातोय " तेव्हा खुप वाटतं कि आपणही जावं, परत लहान व्हावं, सणासुदीची मजा अनुभवावी, आई- बाबा , काका काकू, दादा -वहिनी, ताई ह्यांच्याकडून लहानपणापासून केलं गेलेलं माझ pampering परत एकदा अनुभवावं ! आज रोहन (माझा दादा) म्हणाला कि मी आपलं लहानपण, महालक्ष्म्यांची मजा, माहूरची ट्रिप सगळ खूप मिस करेन तेव्हा मन भूतकाळात गेलं! दर वर्षी महालक्ष्म्यांना जाणं हि किती आनंदाची गोष्ट् असायची! आई , ताई , काकू ह्यांना फुलोरा , आरास करतांना पाहणं , महालक्ष्म्यांना वाजत गाजत आणणं , त्यांना साड्या नेसवणं , दागिने घालणं , आरास करणं , मुखवटे बसवणं हे सगळं मोठी माणसं करत असताना मध्ये मध्ये लुडबुड करणं ह्यात खूप मजा यायची. दुसऱ्या दिवशी काकू- आई ह्यांना नैवेद्याचा सोवळ्यात स्वंयपाक करताना बघून, स्वैपाकघरातून रुचकर नैवेद्याचा घमघमाट येताना बघून पोटातली भूक चाळवली जायची. मग काकूंच्या हातचा उपमा, चिवडा -लाडू असा भरपेट नाश्ता सगळे बहीण भाऊ मिळून करायचो. त्यात मन आणि पोट दोन्ही मनसोक्त भरायचं .. मग रोहन , मी , अजित दादा ,प्रसाद दादा आणि देवी अंगणातल्या स्वस्तिकाच्या झाडाची भरपूर फुलं काढायला जायचो. वैजू ताई ,वर्षा ताई एव्हाना भरपूर फुलं घेऊन हार करायला बसलेल्या असायच्या . हार करावा तर ह्यांनीच ! मी तर हार करायला ताईंकडूनच शिकले. भरगच्चं सुंदर हार घातलेल्या महालक्ष्म्या अजूनच सुंदर दिसायच्या. मग गुरुजी येऊन छान साग्रसंगीत पूजा सांगायचे . मग सगळ्यांनी मिळून छान आरत्या म्हणायच्या, धूप फिरवायचा, काजळ धरायचं आणि ते लगेच डोळ्यात घालायचं .. आणि मग पुसदचे स्पेशल पेढे प्रसाद म्हणून मनसोक्त खायचे. मग पंगतीमध्ये आई, ताई, काकू ह्यांना छोटे , कोरडे पदार्थ वाढायला थोडी मदत करायची आणि महालक्ष्म्यांचे विडे कसे तयार करतात ते बघायचं ! ह्या सगळ्यात दुपारचे तीन चार कसे वाजायचे कळायचंच नाही. दुपारची महापूजा आणि दगदग आटोपून सगळे निवांत बसलेले असताना कधी गप्पा, कधी अंताक्षरी ह्यात दिवस संपायचा. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची कहाणी वाचणे, गाठी पाडणे , अष्टक म्हणणे आणि पौतं बांधून मोठ्यांना नमस्कार करणे ह्यात सकाळची दुपार व्हायची. मग संध्याकाळी आई ,काकु छान साड्या नेसून हळदी - कुंकवासाठी तयार व्हायच्या आणि मला आणि देवी ला रोहन, प्रसाद दादा , अजित दादा आम्हाला पुसद चे फेमस गणपती बघायला न्यायचे. .मोठ्या दादा लोकांना दुसरं काम असलं तरी रोहन मात्र न चुकता दर वर्षी आम्हाला नक्की गणपती बघायला न्यायचा. असे हे महालक्ष्म्यांचे तीन दिवस हसतखेळत कसे निघून जायचे कळायचं सुद्धा नाही. परत नागपूरला निघताना मन जड व्हायचं! तसंच ते आताही झालंय! ते नुसतं feeling nostalgic असं स्टेटस ठेवून सांगता येणार नाही. पूर्वी मुलींना सासुरवास असायचा म्हणून हे माहेरवाशिणींसाठी खास सण असायचे ,तेव्हा मुली माहेरी येऊन जरा रीलॅक्स व्हायच्या. हल्ली आम्हा मुलींचे सासरी छान लाड होतात, कोडकौतुक होतं..तरीही माहेरच्या ह्या खास आठवणीने मन का हळवं होतं ? -वैदेही राजे - जोशी

Friday, July 22, 2016

चक्रव्यूह

I beg to disagree !" अतिशय मंजुळ पण आत्मविश्वासपूर्ण आवाज कॉन्फरन्स रूम मध्ये घुमला आणि आपल्याच प्रेझेंटेशनमध्ये गुंगलेल्या हर्षदने अविश्वासाने मागे वळून पाहिले! हर्षद क्षीरसागर, HK ग्रुपचा चेअरमन. फर्स्ट जनरेशन बिझिनेसमन. सेल्फ मेड मॅन. कोट्याधीश. आपले कोणतेही निर्णय कधीच चूक नसतात ह्याचा अभिमान बाळगणारा. आणि काही चुकले तरी "मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया" ह्या टेचात वावरणारा. थोडक्यात आलम दुनियेची पर्वा न करता आपल्याच धुनकीत जगणारा मस्त कलंदर. त्याला विरोधाची सवयच नव्हती. त्याचे मुख्य कारण असे की त्याला विरोध करायचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अक्कल असणे आवश्यक होते किंवा नोकरी गमवायची तयारी आवश्यक होती. ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव स्टाफ मेम्बर्सपैकी प्रत्येकात असल्याने कोणी त्याच्या वाटेला जात नसे. हर्षदही शक्यतो धंद्यात चुकत नसे. त्याचे आजवरचे बहुतेक निर्णय लॉन्ग टर्म मध्ये योग्यच ठरले होते. जे चुकले त्यातून त्याने स्वतः धडे घेतले होते. पण आजवर त्याला तू चुकतो आहेस हे सांगणारे ऑफिसात कोणीच भेटले नव्हते. त्यामुळे ते वाक्य ऐकून हर्षद अविश्वासाने मागे वळला. कॉन्फरन्स रूममध्ये दडपणयुक्त शांतता पसरली! त्या आवाजाच्या दिशेने पाहात हर्षद म्हणाला "come again please!" तोच आवाज आणखी निर्धाराने आला "मला हा निर्णय कंपनीच्या हिताच्या दृष्टीने जरा रिस्की वाटतो आहे. This will impact the top line badly and also the reputation of the organisation!" मानसी पटवर्धन, फक्त हुशारीच्या जोरावर सीए आणि एमबीए करून दहा वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन HK मध्ये व्हीपी फायनान्स म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. HK मध्ये, विशेषतः हर्षद समोर डेसिग्नेशला फारसा अर्थ नसे. हर्षदने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पाचशेच्या वर स्टाफ पगार घेत होता. त्याच्या दृष्टीने त्यातीलच एक "जरा जास्त पगार घेणारी" ह्या पलीकडे फारसे महत्व नसलेली बाई आज त्याला मॅनेजमेंट टीम समोर चॅलेंज करत होती. चक्क तू चुकतो आहेस असे खुल्ला सांगत होती! "ओह. आपण जे काही म्हणालात ते जरा डिटेल मध्ये समाजवाल का आम्हा सर्वांना?" इतके कुत्सितपणे म्हणत हर्षद त्याच्या गुबगुबीत चेयरमध्ये कॉफी सिप करत बसला आणि मानसीला समोर येऊन बोलायची त्याने सूचना केली. मानसी शांतपणे चालत पुढे आली आणि हर्षदचेच प्रेझेंटेशन एक एक स्लाईड करत दाखवत, त्यावर आपले मत मांडत आपले मुद्दे डेटा पॉइंट्ससह शाबीत करत गेली. हर्षदला तिची हुशारी, आत्मविश्वास, ज्ञान आणि मुख्य म्हणजे हिम्मत ह्याचे मनोमन कौतुक वाटत होते. तिचे प्रेझेंटेशन संपले. हर्षद हातात पेन फिरवत, पेनाकडे बघत विचारात गुंगला होता. दोन मिनिटे शांततेत गेली. सगळेजण हर्षदच्या प्रतिसादाची वाट बघत होते. अचानक हर्षद उठून उभा राहिला. बाकी सर्व लगबगीने उठले. "Gentleman let me think through this. Wait for my mail tomorrow." इतके म्हणून हर्षद निघून गेला. जाताना फक्त एक कटाक्ष मानसीकडे टाकून. ती शांतपणे आणि त्याच आत्मविश्वासाने उभी होती. सुंदर चेहर्यावर मोहक स्माईल लेऊन. आपल्या केबिन मध्ये आल्यावर हर्षद विचारात पडला. म्हटलं तर त्याला मानसीचं डेरिंगबाज वागणं आवडलं होतं. पण कुठेतरी इगो दुखावल्यामुळे तिचा रागही येत होता. इतकी वर्ष आपल्या मनाला येईल ते डिसिजन घेणारा हर्षद आज विचारात पडला होता. इकडे ऑफिस मध्ये मात्र उद्या काय मेल येणार ह्याची कुजबुज सुरु होती. काही जणांना मानसीचे कौतुक वाटत होते. काही जेलस लोक कशी बॉस ची जिरली ह्याच विचाराने सुखावले होते तर कंपनीतल्या काही सिनियर लोकांना मानसीच्या जॉबची चिंता लागून राहीली होती कारण त्यांना त्यांच्या बॉसचा स्वभाव आणि आधीच्या एमप्लॉयीजचा इतिहास हे सगळे ठावूक होते. “हर्षद सर , आठ वाजलेत. आजही उशिरापर्यंत काम करणार आहात का?” अरुणने म्हणजेच कंपनीतल्या प्यूनने त्याच्या बॉसला नेहमीप्रमाणे विचारले. “काका तुम्ही बाकी सगळं बंद करून व्हा पुढे. मी माझं काम झालं कि निघेन. मला आज वेळ लागणार आहे. तुम्ही जा घरी. उगाच तुमचा खोळंबा नको. चाव्या नेहमीप्रमाणे watchman कडे ठेवतो मी. “ हर्षद ने त्याच्या चांगुलपणाच्या नेहमीप्रमाणे प्यून ला घरी पाठवले आणि कामं करीत बसला. वर्कोहोलिक असलेल्या हर्षदच्या डोक्यात फक्त कामाचेच विचार असल्यामुळे लग्न बिग्नाचा विचार त्याने घरचे मागे लागून लागून कंटाळले तरी कधी केला नव्हता. म्हणूनच ऑफिस मध्ये उशिरापर्यंत काम करण्याची लक्झरी त्याच्याकडे होती. शेवटी जेव्हा भुकेची जाणीव झाली तेव्हा रात्री अकरा वाजता त्याने ऑफिस बंद केले आणि पार्किंग मधून बाईक काढून तो निघाला. एका कंपनीचा मालक असला तरी हर्षद ला चारचाकी गाड्यांचे कधीच आकर्षण नव्हते. त्याचे फर्स्ट लव्ह होते बाइक्स आणि स्पीड. नेहमीप्रमाणे हेल्मेट घालून निर्मनुष्य रस्त्याने तो निघाला. अशाच एका निर्मनुष्य गल्लीतून जाताना त्याला एक माणूस जखमी अवस्थेत जीव मुठीत घेऊन पळताना दिसला. आणि त्याच्या मागे दोन माणसे हातात कोयता आणि तलवार घेऊन त्याच्या मागे पळत होती. तो माणूस नेमका हर्षद च्या गाडी समोर येऊन पडला आणि त्याला वाचवायला म्हणून हर्षदने करकचून ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. त्याला मदत करणार इतक्यात ती दोन माणसे आली आणि त्या जखमी माणसावर सपासप कोयत्याचे वार करून त्या माणसाला जागीच ठार केले. वर हर्षदलाही धमकी दिली कि ह्या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास त्याची अवस्था सुद्धा त्या ठार मारलेल्या माणसासारखीच होईल. जे काय डोळ्यासमोर दिसतंय ते समजेपर्यंत ती माणसं निघून गेली होती आणि हर्षद समोर पडला होता एका अनोळखी पुरुषाचा रक्तबंबाळ मृतदेह. ते सगळं बघून हर्षदला घेरी आली आणि भयंकर भीती वाटली .त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला आणि त्याला त्या मारेकर्यांचे बोलणे आठवले. त्याने गाडीला किक मारली आणि तो कसाबसा घरी पोचला. त्याची तहानभूक सगळीच मेली होती. पायातील बूट काढून कसाबसा बेडवर आडवा पडला आणि त्याचे विचारचक्र सुरु झाले. त्याच्या मनात भीती बसली. आता ती माणसं आपला जीव तर घेणार नाही ना ? काय करावं आता? ती माणसं आपला पत्ता शोध घरी किंवा ऑफिस मध्ये तर नाही येणार ना?ह्या विचारांनी त्याचं डोकं भणाणून गेलं. ह्याच विचारात त्याला पहाटे केव्हातरी झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले होते. हर्षदच्या आई वडीलांना हर्षद चे हे अनियमित रुटीन नवीन नव्हते.त्यामुळे रात्री उशिरा आला म्हणून आईनेही त्याला उठवले नाही. हर्षद उठला तेव्हा त्याचे डोके घणाचे घाव घातल्याप्रमाणे दुखत होते आणि ताप चढला होता. त्याने सेक्रेटरीला “आज येणार नाही” चा मेसेज टाकून घरीच आराम करण्याचे ठरवले. नाहीतरी कालच्या घटनेमुळे आज त्याचे लक्ष ऑफिस च्या कामात लागणे शक्यच नव्हते. त्याने आईला बोलावून औषध मागितले, आणि सेक्रेटरीला “ Not feeling well. On leave today. If anything urgent, let Mr. Pushkar handle the matter.” असा मेसेज टाकून तो परत बेड वर आडवा पडला. झोप येणे शक्यच नव्हते. “असे किती दिवस घरात बसून राहणार? किती नुकसान सहन करणार! I must tell this to someone. येस. पुष्कर.. पुष्करशी बोलायला हवे. पुष्कर नक्की मला मदत करेल.“ हर्षदने विचार केला व पुष्कर ला ऑफिस नंतर सरळ घरीच यायला सांगितले. पुष्कर म्हणजे हर्षदचा जवळचा मित्र. कंपनी सुरु झाल्यापासून त्याचा पहिला एमप्लॉयी आणि आता HK ग्रुप चा चेअरमन. हर्षद नंतर पुष्करच कंपनीचा सर्वेसर्वा होता. संध्याकाळी पुष्कर आल्यावर हर्षदने पुष्करला सगळे सांगितले आणि हताशपणे शून्यात नजर लावून बसला. जे घडले ते ऐकून पुष्करलाही धक्का बसला पण त्याने हर्षद ला सांगितले कि “ टेन्शन घेऊ नकोस. ते लोक तुला काही करणार नाहीत. त्यांना तुला काही करायचं असतं तर कालच केलं असतं जे त्यांच्यासाठी सोपं होतं. फक्त आता हे सगळं विसरून जा आणि कुठेही वाच्यता करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस. आणि उद्यापासून तुझं रुटीन नेहमीसारखं सुरु कर. आणि त्या मिस.मानसीचे काय करायचे ठरवले आहेस?” हर्षदला पुष्करशी बोलून जरा हलके वाटले आणि त्याचे बोलणे पटले. त्याने सांगितले कि मानसीविषयी त्याने काही ठरवले नाही. पण मुलगी हुशार आहे आणि मुख्य म्हणजे धीट आहे. थोड कंट्रोल मध्ये ठेवायला हवी. कारण तिच्या हुशारीचा कंपनीला फायदाच होणार आहे. तिच्या सजेशन्स चा विचार केला जाईल. “चल बाय! उद्या सकाळी ऑफिसला भेटू!” असं म्हणून पुष्कर गेला. दुसर्या दिवशी सकाळी हर्षद नेहमीसारखा ऑफिसला पोचला. केबिन मध्ये जाताच त्याला त्याच्या टेबलवर एक envelope दिसले. त्यावर ना पाठवणार्याचे नाव होते ना पत्ता. त्याने उत्सुकता म्हणून ते उघडून बघितले तर त्यात एक ग्रीटिंग कार्ड होते, ज्यावर लिहिले होते कि “टेक केअर हर्षद. आय नो युअर लिटील सिक्रेट.” हे वाचून हर्षदला चक्कर आली आणि तो खुर्चीवर कोसळला. जरा भानावर आल्यावर त्याने पुष्करला केबिन मध्ये बोलावून घेतले. पुष्करसुद्धा ते कार्ड पाहून हादरला. पण त्याने हर्षदला शांत राहण्याचा सल्ला दिला. आणि सांगितले कि कदाचित कुणीतरी मुद्दाम मस्करी केली असेल. परत असं काहीतरी झालं तर बघू काय करायचं ते. हर्षद शांत झाला खरा पण त्याला हे प्रकरण काही सोपे वाटत नव्हते. आपलं मन तो कामात रमवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता खरा पण त्याच्या मनातून कालची भयंकर घटना काही जात नव्हती. दोन तीन दिवस असेच गेले आणि एक दिवस हर्षदच्या घरी एक कुरियर आले. त्यावरही पाठवणार्याचे नाव पत्ता काहीही नव्हते. आणि परत एका ग्रीटिंग कार्ड वर एक मेसेज होता. “हाय हर्षद! पोलिसांकडे जायचा विचारही करू नकोस. नाहीतर माहितीये ना काय होईल? “ हे बघून हर्षदच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने pAnic होऊन पुष्करला बोलावून ते कार्ड दाखवले. आता मात्र पुष्करने हर्षद ला प्रोफेशनल हेल्प घेण्याचे सुचवले. हर्षदचे contacs मोठे होते. त्यामुळे त्याने डायरेक्ट पोलीस कमिशनर अय्यर ह्यांची भेट घेऊन त्यांना सगळी कल्पना दिली. त्यांनी त्याला संपूर्ण सहकार्य करण्याबद्दल आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेण्याबद्दल आश्वस्त केले. त्यांचा खुनाचा तपास सुरुच होता त्यात त्यांना एक साक्षीदार सापडला होता. त्याने मारेकर्यांचे संपूर्ण वर्णन पोलिसांना सांगितले. दोन दिवसात पोलिसांनी खुन्यान्ना शोधून काढले. आणि तसे हर्षद ला कळवले. ती केस वैयक्तिक शत्रुत्वातून घडलेल्या गुन्ह्याची होती आणि मारेकरी सुद्धा हर्षद ला blackmail करू शकतील असे वाटत नव्हते. ते स्वतःच स्वतःच्या टोकाच्या रागातून घडलेल्या गुन्ह्यामुळे घाबरलेले होते. आणि हर्षद ने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याला त्या लोकांनी पहिले नव्हते. गुन्हेगार पकडले गेले हि बाब पोलिसांनी जाहीर केली नाही कारण पोलिसांना हर्षदच्या blackmailers ना शोधून काढायचे होते. गुन्हेगार पकडल्या गेल्यामुळे हर्षद्ची भीती कमी झाली होती. तरी अनपेक्षित पणे परत त्याला एक निनावी ग्रीटिंग कार्ड मिळाले. ह्यावेळी परत त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर. त्यातही धमकीवजा संदेश होता. आता मात्र पोलिसांची खात्री पटली कि हे blackmailing कुणीतरी भलतीच व्यक्ती करतेय जिचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.मात्र त्याला फक्त हर्षद ला मानसिक त्रास देण्यात रस आहे. पोलिसांनी हर्षदला परत परत आठवून बघायला सांगितले कि कोणाकोणाला ह्या घटनेबद्दल माहिती आहे. पण पुष्करखेरीज कुणालाही हर्षदने ह्या बाबतीत सांगितलेले नव्हते. संशयाची सुई पुष्कर वर आली होती पण पुष्करची चौकशी केल्यानंतर पोलिसांना तो निर्दोष आढळला. दिवस जात होते पण blackmailerचा शोध काही केल्या लागत नव्हता. आणि हर्षदला धमकीवजा संदेश असलेले ग्रीटिंग कार्ड मिळतच होते. त्यावर काहीच लिहिलेले नसल्यामुळे कुणी पाठवले , कुठुन पाठवले ह्याचा थांगपत्ता लागत नव्हता. एक दिवस पुष्कर आणि हर्षद सगळे कार्ड्स घेऊन बसलेले असताना पुष्करच्या लक्षात आले कि सगळे कार्ड्सवरील हस्ताक्षर एकच आहे. त्याला ते हस्ताक्षर कुठेतरी पाहिल्याचे आठवत होते पण नेमके कुठे हे कळत नव्हते. पहिल्यांदा कार्ड ऑफिसच्याच पत्त्यावर आले म्हणून त्याला संशय ऑफिस स्टाफ वरच येत होता. त्याने हि गोष्ट अय्यर साहेबांच्या कानावर घातली . राहून राहून त्याला वाटत होते कि कोण अशी हिम्मत करेल? इतका टोकाचा सूड कोण उगवेल? हर्षद विषयी स्टाफ मध्ये असंतोष होता पण त्याचा सूड घेण्यासारखं कुणीच नव्हतं. पण पोलिसांच्या मते कोण कुणाचं काय बोलणं मनाला लावून घेईल ह्याचाही भरवसा नाही. म्हणून पोलिसांनी हर्षदला ऑफिस स्टाफच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवायला सांगितले. पण तेही काळजीपूर्वक! कारण नमुने घेताना blackmailerला संशय येत कामा नये. इतके दिवस गुप्तता पाळली तर थोडक्याने गडबड व्हायला नको म्हणून एक दिवस हर्षदने टीम बिल्डींग activity च्या नावाखाली सर्व स्टाफ चे हस्ताक्षराचे नमुने मिळवले. पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञाची मदत घेतली असता, त्यांना आढळले कि पंकजनामक सेल्स ऑफिसर च्या हस्ताक्षराशी ग्रीटिंग कार्ड मधील हस्ताक्षर मिळते जुळते आहे. हर्षद ला हे ऐकून धक्का बसला .कारण पंकज अतिशय शांत असं मुलगा होता. कामात कधीतरी काही चुका केल्या असल्या तरी तो कुणाच्या अध्यात न मध्यात असा होता. पण वेळी अवेळी कधीतरी त्यालाही हर्षदच्या फटकळपणाला सामोरे जावे लागले असल्याने त्याने असे केले असल्याची शक्यता होती. पोलीस स्टेशन मध्ये पंकज, पुष्कर आणि हर्षद बसले होते. सुरुवातीला पंकजने सगळं कबुल करण्यास नकार दिला. पण पोलिसी खाक्याचा दणका बसताच त्याने कबुली दिली. “हो. मीच केलयं हे सगळं. मीच सरांना blackmail केलं. आयतीच संधी चालून आली होती मला . ती का सोडू मी? सगळ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या हर्षद क्षीरसागर ला मी मानसिक त्रास दिला. कारण हा माणूस अतिशय स्वार्थी आणि घमेंडी आहे. अतिशय अहंकारी आणि आत्मकेंद्रित आहे. स्टाफला तर हा कवडीमोलाची हि किंमत देत नाही. कुणाच्या चुका समजून घेत नाही. मला तर किती वेळा अपमानित केलंय ह्याने. पण जेव्हा मानसीने ह्याला challenge केलं तेव्हा ह्याचा इगो दुखावला. मला भीती वाटली कि आता हा मानसी ला काढून टाकणार. मी मानसी ला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो. आणि म्हणूनच तिच्यासाठी काहीही करायची माझी तयारी होती. त्या दिवशी जेव्हा मानसीने ह्याची चूक सर्वांसमक्ष दाखवली तेव्हा हा मानसी ला जॉब वरून काढून टाकणार असं वाटलं होतं मला. आणि इतक्या हुशार मुलीच्या करियरची वाट लागू द्यायची नव्हती मला. खरं तर तेव्हाच बोलणार होतो सरांशी. पण सर आलेच नाहीत आणि मग पुष्कर सरांना फोन वर बोलताना ऐकलं आणि त्यांचा तुमच्या घरापर्यंत पाठलाग केला. तुमच्या नकळत तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि ह्या आयत्याच चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं. मानसिक त्रास काय असतो ह्याची कल्पना आलीच असेल ह्या माणसाला. आता तरी पुढे माणसांशी वागताना नीट वागेल हा!” इतकं बोलून पंकज थांबला आणि म्हणाला “मला हवी ती शिक्षा द्या. पण मानसीला काढू नका!” हे सगळं ऐकून हर्षदला धक्का बसला पण ह्यापुढे माणसांना कस्पटासमान न लेखता वागायचं त्याने ठरवलं. पुष्कर आणि पोलिसांच्या मदतीने खरा गुन्हेगार समोर आला होता आणि हर्षद चक्रव्यूहातून सहीसलामत सुटला होता. -वैदेही राजे –जोशी

Wednesday, June 29, 2016

के दिल अभी भरा नही..

“अभी ना जाओ छोडकर ...के दिल अभी भरा नही...” निर्जराचे सख्खे शेजारी, देशपांडे काका चप्पल घालता घालता छान गुणगुणत होते. लिफ्ट कडे जाता जाता ते सहज तिच्या घरात डोकावले. “काय निर्जरा , आलीस होय ऑफिस मधून?” काकांनी सहज चौकशी केली. रोज करतात तशीच.. तिनेही हि हसून उत्तर दिले. “हे काय आत्ताच आले. पण तुम्ही पार्टी बिर्टी ला चाललात कि काय? इतके छान तयार होऊन निघालात म्हणून विचारलं!” तिने हि नेहमीसारखं विचारलं. “छे गं ! पार्टी बिर्टी काही नाही. ते नवीन नाटक आलय ना ‘दिल अभी भरा नही’ ते बघायला जातोय मित्रांबरोबर. राघव ने मस्त पहिल्या रांगेतली तिकिटं अधून आणलीयेत आमच्यासाठी आणि फार आग्रह केला कि आजोबा, हे नाटक बघाच एकदा, म्हणून जातोय गं, तेवढाच विरंगुळा!” आजोबा म्हणाले आणि पटकन गेले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा आजोबांचा इतका सळसळता उत्साह पाहून तिलाच छान वाटलं. ती आत वळणार इतक्यात निर्जराचा नवरा रेयांश आला आणि घरात शिरता शिरता म्हणाला, “ ह्या देशपांडे आजोबांची पण कमाल आहे हा! ऐंशी वर्षाचे झाले पण म्हणे ‘दिल अभी भरा नही’ . अजून चाललेत नाटकं बघायला सूट बूट घालून! “ “अरे तुला काय करायचंय? जाउदे ना त्यांना! तू जा फ्रेश हो आणि चल चहा घे! ” निर्जरा वैतागून म्हणाली. ती दार लावणार इतक्यात तिला देशपांडे आजी दिसल्या.. डोळ्यात पाणी होते त्यांच्या! “बहुतेक रेयांशचं बोलणं ऐकलं त्यांनी! आता उद्या समजूत काढावी लागेल आजींची! ह्या रेयांशला कळतच नाही कुठे काय बोलावं ते! काय गरज होती असं बोलायची? “ असा विचार निर्जरा करत होती आणि आजींना बघून कसंनुस हसून तिने दार लावून घेतलं. दुसर्या दिवशी संध्याकाळी निर्जरा जरा लवकरच आली. आली ते आजींशी बोलायचं हा निर्धार करूनच! तिने छान चहा केला आणि आजींना हाक मारली. तिला माहित होतं, संध्याकाळच्या वेळी अर्धा पाऊण तास एकट्याच असतात. “आजी येता का चहा घ्यायला? तेवढीच मला कंपनी मिळेल. नाहीतरी रेयांश आज उशिरा येणार आहे.” चहाच्या निमित्ताने निर्जराने आजींना घरी बोलावले. “आले हं! जरा देवाला दिवा लाऊन येते!” आजी येते म्हणाल्या तेव्हा निर्जराचा जीव भांड्यात पडला. कालच्या प्रकाराने आजी रागावल्या तर नसतील ना अशी तिच्या मनात धाकधूक होती. आजी तश्या प्रेमळ होत्या आणि निर्जराला सुद्धा कोणालाही दुखावणे आवडत नसे. म्हणून झाला प्रकार त्यांनी फार मनाला लावून घेतला नसावा असे निर्जराला वाटले. निर्जरा ने दोन कपांमध्ये चहा ओतला , जोडीला छान बिस्किटं प्लेट मध्ये रचून ठेवली तेवढ्यात आजी आल्याच. दोघी एकत्र डायनिंग टेबल वर बसून चहा घेऊ लागल्या. “छान झालाय हं चहा..बरं झालं बाई तू आज चहाला बोलावलंस ते.. नाहीतर ही संध्याकाळ ची वेळ अगदी नकोशी वाटते ग घरात एकटीला. घरात सगळं छान असूनसुद्धा हे कातरवेळ हुरहूर लावते बघ जीवाला.” आजी म्हणाल्या. “आजी, हेही तुमचच घर आहे. या कि रोज चहाला. मलाही छान वाटेल.” निर्जरा म्हणाली. “आजी ..एक विचारू का? काल रेयांश जे आजोबांविषयी बोलला ते ऐकून तुम्हाला वाईट वाटलं असेल ना! खरं तर त्याच साठी मी आज तुम्हाला त्याच्या वतीने सॉरी म्हणायला म्हणून मुद्दामच बोलावले. त्याच्या मनात तसं काहीच नव्हत हो! आपला सहज परिणामांचा विचार न करता बोलून गेला तो! माफ करा आजी त्याला! मला माहितेय तुम्हाला खूप वाईट वाटले असणार. पण तरी तुमचा नातू समजून त्याला माफ करा.” निर्जरा कळकळीने बोलली. “निर्जरा अगं इतकी माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही.. मला जसा राघव तसाच रेयांश. तू वाईट वाटून घेऊ नकोस. काल रेयांश चे बोलणे ऐकून मला वाईट वाटले होते पण ते तेवढ्यापुरतेच. नंतर मी तो विषयच सोडून दिला.. अगं तुम्हा तरुण मुलांच्या मनात हे येणेही अगदी साहजिक आहे कि संपूर्ण आयुष्य गेल्यावर आता म्हातारपणी कशाला बाहेर फिरायचं? नाहीतरी आपल्याकडे पूर्वीपासून अशीच मानासिकता आहे की म्हातारपणी आपापल्या खोलीत बसावं ,जगापासून अलिप्त राहावं आणि मरणाची वाट बघत हरी हरी करावं. पण ज्याच्यावर वेळ येते ना, त्यांच्यासाठी हे खूप कठीण असतं गं!” आजी पोटतिडकीने मन मोकळं करत होत्या आणि निर्जरा मन लावून आजींचे बोलणे ऐकत होती. “अगं आम्ही सुद्धा आधी ह्याच मानसिकतेचे होतो. एका विशिष्ट वयानंतर सणासुदीला नवीन कपडे घेणं , बाहेर येण जाणं कमी केलं होतं , सगळ्यातून अलिप्त राहू असच ठरवलं होतं. अरुण आणि कल्याणी अगदी प्रेमाने आमचं सगळं करत होते . आम्हाला हवं नको ते सगळं छान बघतात ती दोघं, नातवंड म्हणजे तर अगदी आमचे जणू मित्रच होते नि आहेत. तरी आमच्यासाठी त्यांनी आपापली कामे का सोडायची? त्यांनाही त्यांचं आयुष्य आहेच कि! मुलं आपापल्या व्यापात असतात नि मोठ्या शहरात नोकरीच्या ठिकाणाहून परत यायलाही उशीर होतो. अशावेळी संध्याकाळची वेळ अगदी आम्हाला दोघांना नको वाटायची. हुरहूर लागायची जीवाला. हे तर अगदी खचल्यासारखे दिसायचे आणि माझ्या डोळ्यात का कुणास ठावूक पाणी यायचं. शेवटी आमच्या मुलांनाच आमचं हे अलिप्त वागणं आणि आमची मानसिक अवस्था बघवली नाही आणि एक दिवस त्यांनी आम्हाला समोर बसवून विचारलच कि त्यांचं काही चुकतंय का ! आम्हाला का इतका त्रास होतोय! आम्हालाही कारण कळेना गं! आणि त्यांनी आमचं कौन्सिलिंग का काय म्हणतात तेच केलं! आणि आम्हा दोघांनाही त्यांचं बोलणं पटलं कि म्हातारे झालो म्हणून सकारात्मक राहणं का सोडायचं? छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणं का बंद करायचं? ह्या वयाला हे शोभत नाही, ते करणं चांगलं दिसतं का ह्या समाजाच्या बंधनात का अडकवून घ्यायचं स्वतःला? कशासाठी म्हातारपणाला शाप समजून नकारात्मक विचारात मृत्यूची वाट बघत दिवस ढकलायचे? उलट देवाने इतकं छान बोनस आयुष्य दिलाय ते आनंदात जगायचं. छान आवडी निवडी , छंद जोपासायचे! नवीन पिढीशी, त्यांच्या तंत्रज्ञानाशी ओळख करून घ्यायची, त्यांच्यात सामील व्हायचं म्हणजे सकारात्मकता वाढायला मदत होते. सूर्यास्ताची जर हुरहूर वाटते तर त्या सुर्यास्ताच्याच वेळी छान आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ व्यतीत केला तर कशाला हुरहूर वाटेल? हो कि नाही? म्हणूनच संध्याकाळी हे त्यांच्या मित्रांच्यात वेळ घालवतात आणि आनंदी राहत्तात आणि ह्यांना असं उत्साही बघून मीही मुला सुनांच्या आवडीचे पदार्थ करण्यात वेळ घालवते. थोडं वाचन करते, मनाला वाटेल ते करते. बरोबर कि नाही? बघ बोलत काय बसले मी! आज मस्त शेवपुरी करणार आहे घरी, त्याची तयारी करायची आहे. आमच्या कल्याणीला फार आवडते .तुलाही आवडत असेल ना? झाली कि हाक मारते हो तुलाही..चल येते मी.” असं म्हणत आजी उठल्या. “हो आजी ..नक्की हाक मारा मला.. मी येईन मस्त शेवपुरी एन्जॉय करायला! “ निर्जरा म्हणाली. तिला आजी आजोबांचे त्यांच्या सकारात्मकतेबद्दल खूप कौतुक वाटत होते आणि आजी रागावल्या नाहीत हे ऐकून हायसे आणि मोकळेही वाटत होते. वैदेही राजे- जोशी

Thursday, June 16, 2016

आणि नर्मदा बोलावत होती.

रात्रीचे दोन वाजले आणि कावेरी आजींना जाग आली. परत डोळा लागेना म्हणून पाणी प्यायला उठल्या. बघतात तर काय नरेश , त्यांचा नातू , त्याच्या बिछान्या वर नव्हता. आजींच्या काळजात धस्स झाले. घरात सगळीकडे त्यांनी शोधले पण नरेश कुठेही दिसत नव्हता. त्यांनी घाई घाईने त्यांच्या नवर्याला म्हणजेच सुधाकर रावांना उठवले. "अहो.. अहो उठा ना.. बघा ना आपला नरेश परत दिसत नाहीये. कुठे गेला बघा ना.. अहो झोपलात काय? उठा आणि शोधा त्याला." आजी जिवाच्या आकांताने आजोबांना उठवत होत्या. आजोबा ताडकन उठून बसले. "काय गं काय झाले? इतकी का घाबरलियेस तू? " आजोबांनी आजीला विचारले. "अहो घाबरू नको तर काय करू! आपला नरेश कुठेतरी निघून गेलाय रात्रीचा! बघा ना.. शोधून आणा ना त्याला. अहो तिकडे नदीवर तर गेला नसेल ना? काय करायचे आपण आता? अहो बोलावा ना कुणालातरी.. आणा ना त्याला शोधून.." आजी आता रडायला लागल्या होत्या. " अगं पण आपण इतकी काळजी घेऊन परत असं कसं झालं? आता त्याच्या बापाला काय तोंड दाखवणार आपण?" आजोबा कपाळावर हात मारून मटकन खाली बसले. "अहो बसलात काय? उठा ना.. आणा त्याला शोधून. तुम्हाला मेलं वेळेवर काही करायच सुचत नाही. मीच बघायला हवं आता." अस म्हणून पदर खोचून ओसरीवर येऊन आजींनी त्यांच्या नोकराला गणूला हाक मारली. वयाच्या ऐंशिव्या वर्षी सुद्धा आजी खमक्या होत्या. पण आजोबा मात्र आता थकले होते. "गणू ए गण्या .. अरे ए गणू.." आजींनी गणूला आवाज दिला तसा गणू धावत पळत ओसरीवर आला. "काय झाल वैनीबाई? कशापाई रातीचा आवाज देतया? मालक बरे हाइती नं वं? " "अरे गणू नरेश घरात नाहीए. रात्री झोपताना नीट होता. रात्रीचा कुठे जाउ नकोस म्हणून त्याला बजावले देखील होते. सगळी दारं खिडक्या कुलुपबंद करून त्याला झोपवले होते रे..पण आता बघ ना अचानक कुठे नाहीसा झाला कळतच नाहीए. जा जरा बघून ये परत नदिपाशी नाही ना गेलं माझं लेकरू!! जा आणि त्याला घेतल्याविना परत येऊ नकोस." आजींनी फर्मान सोडले. "व्हय वैनिबाई..आत्ता आणतो बघा धाकल्या मालकास्नी हुडकून..तुमि कायबी काळजी करू नगसा..” अस म्हणत गणू नरेश ला शोधायला गेला. इकडे कावेरी बाईंनी दारात भांडं उपड घालू ठेवल आणि त्या देवाचा धावा करत बसल्या. पण त्याचं लक्ष लागतय कुठे! “काय गं.. इथे काय दाराशी बसलीयेस? गणू ला सांगितलस ना नरेश ला शोधायला? येईल बघ तो.. तू आत चाल बरं!” आजोबांच्या ह्या बोलण्याने आजी भानावर आल्या. “ हं! हो! येते!” असं म्हणून आजी आत आल्या खर्या पण मनातून त्या खूप अस्वस्थ व घाबरलेल्या होत्या. “अहो! गिरीजा नसेल ना घेऊन गेली त्याला?” असं हळू आवाजात आजोबांना म्हणाल्या. गिरीजाचं नाव काढल्याबरोबर आजोबा सुद्धा घाबरले. पण उसनं अवसान आणून म्हणाले. “नाही गं! असं कुठे असतं का? ती गेली त्याला २५ वर्ष झालीत आता. इतक्या वर्षांनी कशाला असं काही होईल? असं काही नसतं ! तू उगाच नसत्या शंका काढून जीवाला घोर लावू नकोस.” आजोबा असं म्हणाले खरे पण त्यांनाही तीच भीती वाटत होती जी आजींना वाटत होती. गिरीजा म्हणजे कावेरीबाई व सुधाकर राव ह्यांच्या एकुलत्या एक मुलाची म्हणजेच राजेंद्रची बायको. एकदम शांत , गुणी व सालस मुलगी. एखाद्याला सून म्हणून व बायको म्हणून हवी असे तशीच होती गिरीजा. लग्न करून सासरी येताच तिने तिच्या स्वभावाने व गुणांमुळे सर्वांचे मन जिंकले. पण कुणाची तरी दृष्ट लागली आणि गिरीजाचे आयुष्य उध्वस्त झाले.लग्नाला ५ वर्ष झाली तरी गिरीजाकडे गोड बातमी नव्हती. छोट्या गावात राहणार्या ह्या कुटुंबाला हि गोष्ट म्हणजे गिरीजाचा घोर अपराध वाटू लागला. सर्वांचे गिरीजाशी वागणे बदलले. अगदी राजेंद्रचे सुद्धा! त्यालाही ती डोळ्यापुढे नको असायची. पण गिरीजा मात्र शांतपणे नशिबाचे भोग म्हणून हे सगळं सहन करत होती. टोमणे ऐकून घेणं, कुजकट बोलणी ऐकणं , शुभ कार्यात तिला न बोलवणे हे तिच्यासाठी नित्याचेच झाले होते. पण जेव्हा तिला कळले कि तिच्या सासरचे राजेंद्रचे फक्त वंशाच्या दिव्याच्या अट्टाहासापायी दुसरे लग्न लावून देत आहेत तेव्हा तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि तिने सर्व शक्तीनिशी ह्याचा विरोध केला. पण तिचे प्रयत्न तोकडे पडले आणि राजेन्द्र्चा दुसरा विवाह लावून देण्यात आला. ज्या दिवशी गिरीजाची सवत घरात आली त्याच दिवशी सासरच्यांनी गिरिजाला कायमचे माहेरी निघून जाण्यास सांगितले. गिरीजा मानी होती. ती माहेरी गेली नाही. घरातून तर ती बाहेर पडली. पण जाता जाता संध्याकाळच्या वेळी ती म्हणाली. “ज्या वंश्याच्या दिव्याखातर तुम्ही घराच्या लक्ष्मी ला बाहेर काढत आहात, त्याच वंशाच्या दिव्याला एक दिवस मी घेऊन जाईन. हा माझा शब्द आहे. “ ती घराबाहेर पडली आणि नंतर कुणाला सापडलीच नाही. गावातल्या काही लोकांनी तिला गावाबाहेर जो नर्मदेचा प्रवाह वाहत होता तिकडे जाताना पाहिले ते शेवटचेच. नंतर तिचे प्रेतही सापडले नाही. इकडे राजेंद्र आणि त्याचे घरचे ब्याद गेली म्हणून निश्चिंत होते. पण कावेरीआजी मात्र धास्तावलेल्या असायच्या. उगाच बोला फुलाला गाठ नको म्हणून त्यांनी राजेंद्र ला नोकरीसाठी शहरात पाठवून दिले व नरेश च्या जन्मानंतर त्याला बजावले कि चुकून सुद्धा गावात यायचे नाही. उलट आम्हाला आठवण आली कि आम्हीच शहरात येऊन तुमची भेट घेऊ. आणि आज तब्बल २५ वर्षांनंतर नरेश एकटाच गावाला आला होता. त्याने त्याचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाबांकडे हट्ट केला होता कि मला एकदाच गावाला जाऊन येऊ द्या. फक्त दोन दिवस! मुलाचे मन बापाच्याने मोडवेना म्हणून राजेंद्र ने नरेश ला आजी आजोबांकडे पाठवले ,पण बाजावूनच कि आजी आजोबा सांगतील तसच वागायचं , उगाच गावात इकडे तिकडे अनोळखी ठिकाणी भटकायला जायचे नाही. नरेश ने बाबांना वचन दिले कि तो त्यांना काळजी वाटेल असे काहीही करणार नाही. आणि तो बस ने गावाला यायला निघाला. गावाला पोचल्यावर रिक्षा वगैरे च्या भानगडीत न पडता त्याने गाव बघायला मिळेल म्हणून सरळ चालत घरी जायचा निर्णय घेतला. घराकडे जात असताना का कुणास ठाऊक पण कुठल्याश्या अनामिक ओढीने तो नदीच्या प्रवाहाकडे चालत जाऊ लागला. नदीच्या पात्रामध्ये पाय ठेवणार इतक्यात त्याला कुणीतरी हटकले. “ओ पाव्हनं ! तिकडं कुठं जाताय? भोवरा आहे पाण्यात! पोहायला येतं का तुम्हास्नी? उगा जीव जायचा! अन कुणाकड आलं म्हणायचं तुमी?” रामाचे बोलणे ऐकून नरेश भानावर आला आणि म्हणाला अहो मी नरेश , सुधाकर पाटलांचा नातू! आजच आलो आजी आजोबांना भेटायला!” हे ऐकून रामा म्हणाला ,”पाटलांचा व्हय रे तू! चल तुला सोडतो घरी! म्या बी तिकडच चाल्लूया !” नरेश ला घेऊन रामा पाटलांच्या घरी गेला आणि त्याने सांगितले कि नरेश कसा एकटाच नदीकडे जाताना त्याला दिसला आणि त्याने नरेश ला घरी आणून सोडले. पाटलांनी रामाचे आभार मानले आणि नरेश ला बजावले कि परत नदीच्या रस्त्याला सुद्धा जायचे नाही. त्यांना गिरीजाच्या सूडप्रतिज्ञेची आठवण झाली आणि काळजी वाटू लागली. रात्री झोपताना नरेशने परत कुठे जाऊ नये म्हणून त्यांनी कडेकोट बंदोबस्त केला तरी नरेश अचानक नाहीसा झाला होता. “देवा आमच्या पापाची शिक्षा आमच्या पोराला देऊ नकोस”. असं म्हणत दोघेही देवाचा धावा करत बसले होते तेवढ्यात गणू नरेश ला घेऊन आला. गणू ने सांगितले कि नरेश त्याला नदीच्या रस्त्यावरून परत येताना दिसला. आजी आजोबा दोघांनीही नरेश ला चांगलेच फैलावर घेतले . पण नरेशने त्यांना सांगितले कि त्याला कळलेच नाही कि तो झोपेतून उठून चालत नदीपाशी कसा पोचला.नरेश ला काहीही आठवत नव्हते. त्याला इतकेच आठवत होते कि पायाला नदीच्या पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्याला एका अनोळखी स्त्री ने हटकले आणि परत घरी जाण्यास सांगितले. आजीने त्याला त्या स्त्रीचे वर्णन विचारले तर त्याने सांगितले कि तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती , कपाळावर मोठे कुंकू होते व चांगल्या घरची वाटत होती. त्यालाही आश्चर्य वाटत होते कि रात्रीच्या वेळी एक चागल्या घरची बाई नदीपाशी काय करत होती. तो तिला विचारणार इतक्यात ती बाई झपझप चालत नाहीशी झाली आणि हा घरी यायला निघाला इतक्यात याला गणू भेटला. चला देव पावला व नरेश सुखरूप घरी आला, संकट टळले असे म्हणत सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसर्या दिवशी सकाळीच आजोबांनी हि घटना राजेंद्र ला कळवली व कसलाही विचार न करता राजेंद्र एकटाच परस्पर नरेश ला परत घेऊन जायला म्हणून गावाकडे निघाला. गावी पोचल्यावर त्याने त्याच्या आई वडिलांना सांगितले कि तो नरेशला परत घेऊन जायला आला आहे.व ती दोघं उद्या सकाळी निघणार आहेत. आजी आजोबांना घडल्या प्रकारची पुनरावृत्ती व्हायला नको असेच वाटत असल्याने त्यांनीही परवानगी दिली. बर्याच वर्षांनी गावाकडे आल्याने राजेंद्र जरा निवांत होता. जरा जुन्या मित्रांना भेटून येतो असे सांगून तो घराबाहेर पडला पण मित्राच्या घराच्या दिशेने न जाता ओ कुठल्याश्या अनामिक ओढीने नदीकडे जायला निघाला. त्याला जणू नर्मदा बोलवत होती. चालत चालत नदीच्या पात्रात शिरल्यावर तो भानावर आला पण तोवर उशीर झाला होता. पट्टीच्या पोहणाऱ्या राजेंद्रला नदीत कोणी खेचतय असे वाटू लागले.त्याने बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न विफल ठरले. अखेर त्याने धडपड थांबवली आणि शेवटचे डोळे उघडून पहिले तेव्हा त्याला गिरीजा दिसली, सूडाच्या भावनेनी हसत असलेली.. त्याला ऐकू आले, आज मी मुक्त झाले.. आज मी माझा शब्द खरा ठरवला.. पाटलांच्या वंशाचा दिवा मी नेतेय! निष्पाप नरेशला जीवनदान देऊन तिने राजेंद्रला त्याच्या पापाची शिक्षा दिली होती. गिरीजा मुक्त झाली होती. राजेंद्रला नर्मदेच्या स्वाधीन करून गिरीजा मुक्त झाली होती!.. वैदेही राजे- जोशी..

Friday, February 26, 2016


परक्याचे धन हॉस्पिटल मधून फोन आला आणि घाबरलेल्या नर्मदाकाकूंनी देव्हार्यातले देव ताम्हणातील पाण्यात ठेवून महाराजांच्या पोथीचे पठण चालू केले. पोथीचे पठण यंत्रवत सुरु होते. आणि नर्मदा काकूंच्या मनात सारखे हेच विचार येत होते. “देवा सगळ नीट सुखरूप पार पडू दे रे.. या वेळेला तरी मागच्यासारखं करू नकोस. तुझी काय कमी सेवा केली म्हणून आम्हाला ह्या सुखापासून वंचित ठेवतो आहेस? लक्षं असू दे रे बाबा! सगळं नीट होऊ देत!” “अरे देवा ! दिव्यातले तेल संपत आले आहे. तेल घालायला हवे” असे म्हणत त्यांनी पोथी बाजूला ठेवली, दिव्यातील वात नीट केली व दिव्यात तेल घालून देवापुढे हात जोडून नर्मदाकाकू देवाची करुणा भाकत बसल्या. मनात विचारांची गर्दी असतानाच रश्मीच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. “आई , आता देवांना पाण्यात ठेवून काय उपयोग आहे? आधीच विवेकाने वागला असतात तर आज देवांना पाण्यात ठेवण्याची वेळ तुमच्यावर आली नसती.” रश्मी पोटतिडकीने बोलत होती. “रश्मी, अगं प्रसंग काय अन तू काय बोलतेस? आणि मुलींनी असं उद्धट स्वरात बोलू नये गं ! चांगलं दिसत नाही ते!” “नर्मदा!नशीब तरी तूच बोलतेस हे..मी बोलले तर माझ्या अंगावर धावून येईल हि.. माहेरी होती तेव्हा अगदी गरीब गायी सारखी होती, निमूट सगळं ऐकायची! आता सासरी गेल्यावर मोठे शिंगच फुटलेत महाराणीला. समजाव बाई नर्मदा आता तूच तुझ्या पोरीला..नाहीतर उद्या सासरचे येतील हिच्या कागाळ्या करायला !” पार्वती आजी, नर्मदाकाकूंच्या सासूबाई म्हणजेच रश्मीच्या आजी बोलल्या! “ आजी माझी चिंता करू नकोस. माझ्या सासरचे तुमच्या सारखे कुजकट आणि बुरसटलेल्या विचारांचे नाहीत. सुदैवाने मी सुटले तुमच्या कचाट्यातून आणि माझी बिचारी मीरा वाहिनी सापडली तुमच्या तावडीत. तुमच्या ह्या घरात लग्न करायची काय दुर्बुद्धी झाली तिला कोण जाणे! दादाच्या प्रेमाखातर तिने ह्या घरात गृहप्रवेश केला आणि तिच्यावर हि वेळ ओढवली ..केवळ तुमच्यामुळे!” रश्मीने थंडपणे आजीला उत्तर दिलं! त्यावर आजी उसळून बोलल्या ,”काय अशी वेळ ओढवली गं? बाळंतपणात असं व्हायचच! त्यात काय एवढं? आमची नाही झाली बाळंतपणे? आमच्या वेळी तर ना असे डॉक्टर होते ना अशी औषधं! आणि रश्मी, आता तुझं हे घर नाही. हे आमचं घर आहे आणि आमच्या घरात काय होतं ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू आता परकी आहेस. तू तुझ्या घरचं बघायचस. आम्हाला इकडे अक्कल शिकवायला येऊ नको. तुझी काय ती थेरं तुझ्या घरी कर! इकडे मी आणि तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुमची थेरं चालवून घेणार नाही मी! तू परक्याचं धन होतीस ते आम्ही त्याचं त्यांना दिलय. आता ह्या घरात तू तुझ्या नवीन पद्धती चालवायच्या नाहीस! हे मी शेवटच सांगतेय. नाहीतर आजची हि गोष्ट मला नाईलाजाने तुझ्या बापाच्या कानावर घालावी लागेल. मग तो काय करील ना ह्याच्या भरवसा नाही!” आजी चिडून बोलल्या. आजींच हे बोलणं ऐकून नर्मदाकाकू म्हणाल्या ,”माई ,नका हो असं करू. मी समजावते हिला. ती परत नाही असं बोलणार. तुम्ही ह्यांना काही सांगू नका. लहान समजून माफ करा तुमच्या नातीला. तिच्या वतीने मी माफी मागते तुमची.” देवघरात चाललेला हा संवाद आणि आजीचा मोठा आवाज बाहेर हॉलमध्ये ऐकायला आला तेव्हा लक्ष्मणरावांच्या डोक्यात तिडीक गेली. “काय कटकट आहे ह्या बायकांची? मला घरात असले वाद चालत नाहीत हे माहित असूनही कोण मोठमोठ्यानी बोलतय? घरंदाज बायकांना हे असं बोलण शोभतं का?” अशी बडबड करत लक्ष्मणराव आत देवघराच्या दिशेने चालू लागले. तेव्हा त्यांच्या कानावर रश्मीचे बोलणे पडले. “आई, तुझ्या अश्याच स्वभावामुळे ह्या दोघांचे फावते. आणि आजी, माझ्या सासरच मी बघून घेईन. पण हे ही माझंच घर आहे. बाकी कुठल्या विषयात मी काही बोलत नाही. बोलणारही नाही. पण आज तुमच्या विचित्र वागण्याचा आणि दुसर्याला त्रास देण्याचा कडेलोट झालाय. मला परक्याचं धन म्हणता अन मग जे धन तुम्हाला मिळालय, मीरा वहिनीच्या आई- वडिलांनी तुम्हाला कन्यादान दिलंय ते तरी नीट सांभाळायचं होतं ना? तुला कळतंय का आजी, आज तुमच्या एका फालतू हट्टापायी मीरा वाहिनीचा जीव धोक्यात घातलाय तुम्ही.. आज तिला जर काही झालं तर काय उत्तर देणार आहात तिच्या आई वडिलांना? काय सांगणार त्या छोट्या आर्या ला? काय उत्तरं देणार तिच्या प्रश्नांची? बोल न आजी.. आता का गप्प बसलीस?” रश्मीचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. देवघरात येत ते रागावून म्हणाले, “रश्मी, भरल्या घरात काय आरडाओरड चाललीये? काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस का?” लक्ष्मणरावांना अचानक असे देवघरात आलेले पाहून नर्मदाकाकू घाबरून सावरून उभ्या राहिल्या. येणाऱ्या प्रसंगाला आता कसे तोंड द्यायचे याचं त्यांना टेन्शन आलं. “अहो..अहो.. शांत व्हा ..तुम्हाला त्रास होईल. नका मनावर घेऊ पोरीचं बोलणं. लहान आहे हो अजून ती. माफ करा तिला. बसता का तुम्ही? पाणी देऊ का तुम्हाला?” नर्मदा काकू लक्ष्मणरावांना शांत करायचा प्रयत्न करत होत्या. लक्ष्मणराव त्यांचा काहीही न ऐकता म्हणाले, “रश्मी, वाटेल ती थेरं ह्या घरात चालणार नाहीत. तुझं डोकं चालवायची वेळ आली नाहीये! आम्ही मोठे जिवंत आहोत अजून!” “बाबा आजवर तुमचं सगळं खरं केलंत तुम्ही ! लहानपणी तुमच्या धाकापायी आम्ही तुमचं ऐकत होतो आणि आता तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आणि तुमच्या तब्येतीकडे पाहून सगळे तुमचं ऐकतात. पण तुम्ही मात्र फक्त स्वतःचं खरं करत आलात. कधी आमचा विचार केलात का हो? आमचा जाऊदे ..कधीतरी आईचा तरी विचार केलात? आज मला तुमचा अपमान करण्याची मुळीच इच्छा नाही. किंवा तुम्हाला त्रास व्हावा असेही मला वाटत नाही. पण तुमच्या भ्रमातून तुम्हाला कोणीतरी जागं करणं आवश्यक झालय कारण आता तुम्ही दुसर्याच्या मुलीच्या आयुष्याशी खेळत आहात. “ रश्मी पोटतिडकीने बोलत होती. “काय केलं गं मी असं? काय नुकसान झालं तुझं?” लक्ष्मणराव चिडून बोलले. “रश्मी तू घरी जा. आमचं आम्ही बघून घेऊ. आज तुझ्यामुळे माझ्या मुलाला काही झालं तर तुझं तोंड कधी बघणार नाही मी.” पार्वती आजी ओरडल्या. “आजी, ते माझे वडील आहेत. आणि तू आज आमच्यात पडू नकोस. फार तर काय होईल? हे मला इकडून हाकलून देतील, कधी माझं तोंड बघणार नाहीत इतकाच ना? करू देत त्यांना काय करायचं ते. पण ह्यांना त्याच्या वागण्याची जाणीव कोणीतरी करून देणं अतिशय आवश्यक आहे. आणि आज मी तुझं काहीही ऐकणार नाही. तू प्लीज आमच्या मध्ये पडू नकोस नाहीतर माझ्याकडून माझी इच्छा नसताना तुलाही काहीतरी वेडंवाकडं बोलल्या जाईल आणि तुला वाईट वाटेल.” रश्मीने आजीला स्पष्टपणे सांगितले. “बाबा मला आठवतं तेव्हापासून अरविंद दादा आणि माझ्यात तुम्ही फरक करायचात. आजी तर अगदी खाऊ सुद्धा त्याला जास्त आणि मला कमी असा द्यायची. पण दादाचं माझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे दादाने कधीही माझ्यावर अन्याय होऊ दिला नाही. स्वतः त्रास सहन करून मला प्रेम दिलं. पण नंतर मोहित झाला आणि तुम्ही आणि आजीने सतत माझ्यावर अन्याय केला. मला आठवतं मोहित झाला आणि आईचं सगळं लक्षं त्याच्यावरच केंद्रित झालं. ती जणू विसरलीच कि तिला अजून दोन मुलं देखील आहेत ज्यांना तिनेच जन्म दिलाय. मी कौतुकाने मोहितशी खेळायला गेले कि आजी खस्स्कन मला मागे ओढायची. मी आईच्या मांडीत बसायला गेले कि आजी धपाटा घालायची पाठीत. आईने सुद्धा कधी आजीच्या ह्या वागण्याला विरोध केला नाही. आजीला तर कधी माझ्याविषयी काही वाटलेच नाही, पण मी तर तुमचीच मुलगी होते ना? मग तुम्ही का असे अंतर दिलेत मला नेहेमी? तुमचं असं वागण पाहून मोहित सुद्धा माझ्याशी नीट वागत नाही. म्हणूनच माझ्या मनात त्याच्याविषयी अढी निर्माण झाली. मला सांगा ज्या मोहित साठी तुम्ही माझ्यावर सतत अन्याय केलात तो कसा वागला? सांग ना आजी, कुठे गेला होता तो देवाला सोडलेला वळू जेव्हा बाबांना त्याची खरी गरज होती?” रश्मी बोलत होती. मोहित विषयी असं बोललेलं आजी ला सहन झालं नाही. ती ओरडली, ”रश्मी! अगं तो लहान भाऊ आहे तुझा. ह्या घराण्याच्या वंशाचा दिवा आहे तो! त्याच्याविषयी असं बोललेलं मी खपवून घ्यायची नाही.” “हो? वंशाचा दिवा? काय दिवे लावलेत गं त्याने? माझं शिक्षण डावलून त्याच्यासाठी कॉलेजमध्ये लाखो रुपयांचं डोनेशन भरून त्याला घातला ना इंजिनिअर व्हायला? काय दिवे लावलेत त्याने? २ वर्ष कॉलेजमध्येच गेला नाही. कुठे उकिरडे फुंकत होता कोण जाणे! बाबांनी विचारल्यावर खोटी मार्कलिस्ट दाखवली त्याने. अन हे सगळं बाबांना बाहेरून कळाल त्याच वेळी त्यांना हार्ट अटॅक आला. त्यावेळी मी आणि दादाने सगळी धावपळ केली. पण आला का तुझा हा वंशाचा दिवा एकदातरी तोंड दाखवायला? आताही जेव्हा घरात आईला , बाबांना टेन्शन आहे, आधाराची गरज आहे तेव्हा कुठे आहे तुझा वंशाचा दिवा? बसला असेल कुठेतरी मित्रांसोबत अड्ड्यावर पत्ते कुटत. त्याच्यासाठी वाया घालवले ते पैसे माझी मेडिकल ची फी भरायला वापरली असती, तर आज तुमच्याच घराण्याचं नाव झालं असतं. पण मला माझी इच्छा असतानाही डॉक्टर बनू दिलं नाही तुम्ही.माझं जाउद्या हो! माझ्या सगळ्या इच्छा आता माझ्या सासरी पूर्ण होत आहेत. तुम्ही मी मुलगी म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलत. पण दादाने काय बिघडवलय तुमच? का त्याच्या आयुष्याशी खेळत आहात? देवाच्या दयेने छान नात मिळाली ना तुम्हाला? मग पहिल्या बाळंतपणात त्रास होऊन सुद्धा का वाहिनीला दुसरा चान्स घ्यायला भाग पाडलत? का दादाशी असे शत्रू सारखे वागलात? “ लक्ष्मणराव सुन्न होऊन ऐकत होते. आजवर त्यांना त्यांच्या अश्या वागण्याची जाणीव कोणी करून दिली नव्हती. पण आज त्यांची मुलगीच त्यांना त्यांच्याच मुलाचा शत्रू म्हणत होती आणि हे ऐकून लक्ष्मणराव अंतर्मुख झाले. “तुम्हाला चांगली सून मिळाली म्हणून तुम्ही तिलाही सोडल नाहीत? आणि त्या छोट्या आर्या चा काय दोष? माझ्याशी जसे वागलात तसेच आजी आर्याशी वागते. लाज नाही का गं वाटत आजी तुला? स्वत: एक स्त्री असून एका लहान मुलीशी वाईट वागतेस? तुम्ही सुद्धा दादाला सतत मुलगा हवा घराण्याला वारस हवा म्हणून मागे लागलात, माझ्या तब्येतीचं काही खरे नाही, मारण्याच्या आधी एकदा नातवाचे तोंड बघू दे म्हणून त्याला सतत इमोशनली ब्लॅकमेल केलत. आणि तुमच्या प्रेमाखातर दादाने हि रिस्क घेतली. आणि दादाच्या प्रेमाखातर वहिनीने हि रिस्क घेतली. तुम्हाला काय वाटतं बाबा कि वहिनीचे आई बाबा मुलीकडची बाजू म्हणून तुम्हाला घाबरतात? तसं वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. त्यांना वहिनीने सांगितलय कि माझ्या घरी कोणालाही काही बोलू नका. आणि वाहिनीच्या प्रेमाखातर ते शांत आहेत. पण आज जर का त्यांच्या मुलीला काही झालं तर ते शांत बसणार नाहीत. आजी,तुझ्यासकट सगळ्यांची पोलीस कम्प्लेंट करायलाही ते मागे पुढे बघणार नाहीत.” इतकं सगळं ऐकल्यावर आजी गप्प बसणे शक्यच नव्हते. ती परत म्हणाली, “रश्मी, तुझा बाप ऐकून घेत असला तरी मी काही ऐकून घेणार नाही. आम्ही काहीही चुकीचं वागलो नाहीये. सुनेकडून वंशाच्या दिव्याची अपेक्षा करणं चूक आहे का? तुझ्या आईने नाही ऐकलं आमचं? काही नाही..हि सगळी तुम्हा नवीन मुलींची थेरं आहेत. ती काही ह्या घरात चालणार नाहीत हो.. घराण्याला वारस हा हवाच.. “ ह्यावर रश्मी पेटून उठून बोलली “आजी, मोहित च्या वेळी आई मरता मरता वाचली होती. माझ्या आणि दादाच्या नशिबात सख्ख्याच आईचं प्रेम होतं म्हणून! नाहीतर तू तर काय लगेच तयार होतीस ह्या घरात दुसरी सून आणायला. तुम्हाला मऊ जमीन मिळालीये ना म्हणून कोपराने खणताय तुम्ही. वृद्धाश्रमात हाकलून देणारी सून मिळाली असती तर कळल असतं तुम्हाला. बाबा, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तरी तुमच्या हृदयाला पाझर फुटू द्या !” रश्मीचं हे सगळं बोलण ऐकून लक्ष्मणरावांना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ते कसं बसं इतकच म्हणू शकले ,”बोल बेटा! आज सगळं बोलून टाक. सगळं मन मोकळ कर. सांग आम्ही कुठे कुठे कमी पडलो. “ आज आयुष्यात पहिल्यांदा रश्मी तिच्या बाबांना रडताना बघत होती. तिला स्वतःचीच लाज वाटली. ती त्यांच्याजवळ गेली. त्यांच्या खुर्चीजवळ त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. लक्ष्मणरावांनी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा आपल्या लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. रश्मी रुद्ध कंठाने बोलू लागली ,”मला माफ करा बाबा. मला तुमचा अपमान करायचा नव्हता. तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुमच्याशी हे सगळं बोलणं सुद्धा खूप आवश्यक होतं. बाबा.. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते प्लीज दादाला सांगू नका कि मी तुम्हाला सांगितलाय. त्याने शपथ घातलीये मला पण तुम्हाला सांगणे आवश्यक आहे. बाबा , दादाला अमेरिकेला खूप चांगला चान्स मिळत होता. पण त्याने तो नाकारला केवळ तुमच्या तब्येतीमुळे! इकडे मोहीतचा काही उपयोग नाही आणि आईला सतत तुमची काळजी असते, तिला एकटीला काही त्रास होऊ नये म्हणून आणि माझ्यावर काही पडू नये म्हणून दादाने त्याच्या करियर मधली एक खूप मोठी संधी सोडली. आणि ह्याला वहिनीचा सुद्धा दुजोरा होता. बाबा, आता तरी तुमची जुनाट मतं सोडून दया. आर्याकडेच तुमच्या घराची ज्योत म्हणून बघा. आणि आजीच्या जुन्या मतांकडे फारसं लक्ष देऊ नका.” तिचं बोलणं ऐकून लक्म्जणराव म्हणाले, “ बरं केलस पोरी तू हे सगळं मला सांगितलस. नाहीतर मला कधी माझ्या मुलांची किंमत कळलीच नसती गं! ह्यापुढे ह्या घरात कुठल्याही स्त्रीवर अन्याय होणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतो. तुझ्या आईवर सुद्धा मी खूप अन्याय केलाय. पण आता तिच्यावर सुद्धा मी अन्याय होऊ देणार नाही. दर से हि सही लेकीन अब इस घर मी सब दुरुस्त होगा. फक्त आता मीरा सुखरूप घरी येऊ दे.” हे ऐकून नर्मदाकाकुंनाही भरून आलं. आणि त्यांनी परत देवाकडे प्रार्थना केली कि “ देवा, मुलगा मुलगी काहीही चालेल. पण आमच्या मीराला सुखरूप घरी येउ दे बाबा.” तेवढ्यात रश्मीचा फोन वाजला. तिच्या दादाचाच फोन होता. तिने थरथरत्या हाताने फोन घेतला आणि म्हणाली ,”बोल दादा, वहिनी कशी आहे?” अरविंद म्हणाला ,”रश्मी, अगं मीरा ठीक आहे आता. स्टेबल आहे. पण मुलगी झाली गं. बाळ सुद्धा ठीक आहे. मी खूप आनंदात आहे. पण घरी...” त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देताच रश्मी म्हणाली, “दादा, मी घरीच आहे. आणि तू काळजी करू नकोस. हि बातमी ऐकल्यावर सगळे खूप खुश होतील. आता आपल्या घरात कोणीही मुलीच्या जन्माचं दु:ख करणार नाही. सगळे वहिनी आणि बाळाचं खूप आनंदात स्वागत करतील. आता तू फोन ठेव आणि वहिनीकडे बघ. बाकी सगळं डिटेल मध्ये नंतर सांगते तुला. ” इतकं बोलून रश्मीने फोन ठेवला आणि म्हणाली, “आई, बाबा, आपल्या घरात परत एक लक्ष्मी आलीये. तुमच्या घरच्या धनात आता देवाने आणखी एका गोड परीची भर घातलीये. मीरा वाहिनी आता बरी आहे. बाळ सुद्धा ठीक आहे. चला आपण सगळे जाऊया हॉस्पिटल मध्ये.” रश्मीने सांगितलेली गोड बातमी ऐकून सगळ्यांना आनंद झाला, आजीने सुद्धा मीरा आणि बाळ सुखरूप आहे हे ऐकून देवाला हात जोडले व सगळे कुटुंब त्यांच्या घरात आलेल्या परीची भेट घ्यायला आनंदाने हॉस्पिटलकडे रवाना झाले. .... समाप्त

Wednesday, February 17, 2016

चॉकलेट डे


सारंग आज खूप टेन्शन मध्ये होता.. “आज चॉकलेट डे.. पाच वर्षांपूर्वी ह्याच दिवशी ह्याच चॉकलेटच्या मदतीने स्पृहाला आयुष्यात आणले होते..आणि आज..” ऑफिस मध्ये आपल्या क्युबिकल मध्ये बसून विचार करत असताना मित्राने आवाज दिला.. “सारंग, चल यार लंच करून येऊ” आणि सारंगच्या विचारांची तंद्री भंगली. स्पृहा आणि सारंग, वर वर दिसणारे एक आदर्श जोडपे. सारंग इंजिनिअर तर स्पृहा इंटेरियर डेकोरेटर. कॉमन मित्रांच्या माध्यमातून ओळख झाली. आणि हळू हळू मैत्री घट्ट झाली. सारंगला स्पृहा चा स्वभाव रोख ठोक स्वभाव आवडायचा. हळू हळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि सारंगने स्पृहा ला प्रपोज करायचे ठरवले. चॉकलेटडे हा दिवस निवडला. ऑफिस मधूनच स्पृहा ला फोन केला. “हैलो स्पृहा, कशी आहेस? तुला आज वेळ असला तर ऑफिस सुटल्यावर भेटूया का ?” स्पृहाला हि सारंगच्या बोलण्यातून वागण्यातून एकंदरीत त्याच्या मनातल्या भावनांची कल्पना होतीच. शिवाय तिलाहि तो आवडत होताच. तो कधी त्याचे मन मोकळे करतोय ह्याचीच ती वाट बघत होती. म्हणून कुठलेही आढे-वेढे न घेता ती म्हणाली , “हो नक्की भेटूया.. पण कुठे भेटायचं ?” “कॅफे निर्वाणा मध्ये भेटूया”. “ओके, साडे सहा शार्प मी तिथे असेन”. इतके बोलून स्पृहाने फोन कट केला. सारंगने सुटकेचा निश्वास टाकला.. “चला पहिली पायरी तरी चढलो. भेटायला तरी हो म्हणालीये..आता पुढचं पुढे पाहू..” असा विचार करून तो काम लवकरात लवकर संपवायच्या मागे लागला. त्याला थोडे लवकर निघायचे होते. कारण स्पृहा ला भेटायला जाताना तिच्या आवडीचे चॉकलेटघेऊन जायचे होते. चॉकलेटम्हणजे स्पृहाचा अगदी वीक point . मूड कितीही खराब असला किंवा Madam कितीही रागावल्या असल्या तरी त्यावरचा रामबाण उपाय म्हणजे चॉकलेटहे सारंगला पक्के माहिती होते. आणि म्हणूनच सेफ साईड दोन chocolates त्याने घेतले आणि तो वेळेच्या थोडा आधीच कॅफे ला पोचला आणि एक कोपर्यातले टेबल पाहून तिथे बसला. म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही. थोड्याच वेळात स्पृहा आली. सारंग ने इकडचे तिकडचे बोलणे सुरु केले आणि शेवटी मनाचा हिय्या करून तो म्हणाला, “स्पृहा, तुला कल्पना आलीच असेल मी तुला इकडे आज का भेटायला बोलावले.. तुझी माझी मैत्री आज ह्या स्टेजला पोचलीये कि फारसे शब्द न वापरता आपल्याला एकमेकांच्या मनातले लगेच कळते. शिवाय तुम्हा मुलींना तर एक सिक्स्थ सेन्स असतो म्हणतात. त्यामुळे तुला तर चांगलीच कल्पना असेल माझ्या मनात काय चाललाय ह्याची! आहे ना?” स्पृहा ज्या क्षणाची इतक्या दिवसांपासून वाट बघत होती तो अखेर आला होता, तरी स्त्रीसुलभ लज्जेला अनुसरून ती म्हणाली कि, “ सारंग, मला कल्पना आहे. पण मला ह्या क्षणी काय बोलावे हे सुचत नाहीये. तू इतक्या अनपेक्षित क्षणी हा प्रश्न विचारलास कि मला काही सुचतच नाहीये.” त्यावर सारंग म्हणाला ,” कम ऑन स्पृहा, आता लपाछपी कशाला खेळायची? तुला माहितीये कि तू मला आवडतेस आणि कदाचित मी हि तुला आवडतो.. आवडतो ना? प्लीज स्पृहा.. बोल काहीतरी.. युअर सायलेन्स इज किलिंग मी.. तुझ्या उत्तरावर माझ सगळ पुढचं आयुष्य अवलंबून आहे यार. माझं सुख – दु:खं सगळं तुझ्या हातात आहे आता.. प्लीज सांग.. तुला मी आवडतो ना? सांग ना.. माझ्या आयुष्यात आपल्या दोघांची सगळी स्वप्न पूर्ण करायला माझी साथ देशील?” सारंग चे हे बोलणे ऐकून स्पृहाच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिला खूप काही बोलायचे होते. पण ह्या क्षणाला शब्द मात्र तिची साथ देत नव्हते. तिने फक्त सारंग च्या डोळ्यात पहिले आणि म्हणाली ,” सारंग, तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. मला समजून घेतोस, माझी काळजी घेतोस, तू मला कधीही दुखावणार नाहीस हि मला खात्री आहे. माझं पुढचं सगळं आयुष्य तुझ्यासोबत वाटून घ्यायला मी तयार आहे.” स्पृहाचे हे उत्तर ऐकून सारंग चा जीव भांड्यात पडला आणि त्याने, “इस बात पे कुछ मीठा हो जाये” असं म्हणत आणलेला चोकलेटचा अख्खा बॉक्स तिच्या पुढ्यात रिता केला.. स्पृहा आणि सारंग एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे दोघांच्याही घरच्यांना माहित होते. जेव्हा दोघांनीही लग्नाचा निर्णय आपापल्या घरी सांगितला तेव्हा घरच्यांनीही तो आनंदानी स्वीकारला. कारण दोघेही चांगल्या घरचे, उच्च शिक्षित होते. आक्षेप घेण्यासारखे काही नव्हते. यथावकाश दोघांच्या घरच्यांनी चांगला मुहूर्त बघून दोघांचा साखरपुडा उरकला व लग्नाची तयारी सुरु झाली. सारंग ला बंगलोर ला चांगली ऑफर मिळत असल्यामुळे त्याने घरच्यांशी व स्पृहाशी बोलून बंगलोर ला शिफ्ट होण्याचे ठरवले. एक महिन्यात सारंग चे बंगलोर ला चांगले रुटीन सेट झाले. दोघांनाही भेटता येत नसल्यामुळे दोघेहि थोडे नाराज होते. पण करियरमध्ये चांगली संधी मिळाली म्हणून सारंग खुश होता व त्याची प्रगती पाहून स्पृहालाही समाधान वाटत होते. यथावकाश लग्न झाले. दोघे छान फिरायलाही जाऊन आले आणि दोघांचे रुटीन आयुष्य सुरु झाले. नवीन शहर, त्यात नवीन आयुष्य आणि करियर ची बसलेली घडी मोडून आलेली स्पृहा बंगलोरच्या नवीन वातावरणाशी व नवरा म्हणून सारंग शी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्यात घरचे सगळे एकटीने बघण्याची सवय नसल्यामुळे तिची तारांबळ उडू लागली. त्यात तिलाही नोकरीची संधी चालून आली. तिने ती स्वीकारली. पण नवीन नोकरी, त्यासाठीचा प्रवास व घराची जबाबदारी व नवीन शहर हे सगळं एकदम अंगावर आल्यामुळे ती भांबावून गेली. घरातले सगळे ती तिच्या परीने नीट करण्याचा प्रयत्न करत होती. पण सारंगला सगळं त्याच्या आईने केले तेच बघायची सवय होती. स्पृहा तिच्या पद्धतीने काही करायला गेल्यास सारंग ते खोडून काढून त्याच्या आईची पद्धत सांगायचा. सुरुवातीला स्पृहाने ऐकून घेतले. पण रोजचेच झाल्यावर तिला राग येऊ लागला. पण वाद नको म्हणून ती गप्प बसायची. सगळं मनात ठेवल्यामुळे तिची घुसमट होऊ लागली. आणि घरात आणखी काही चुका होऊ लागल्या. जसं भाजी आणायला विसरणे, दूध संपले आहे हे विसरणे, दही लावायला विसरणे... सारंगला त्याच्या आईची म्हणजेच मुरलेल्या गृहिणीचा संसार बघायची सवय असल्यामुळे त्याला ह्या साध्या साध्या चुका नवीन होत्या. त्यात त्याला बहिणहि नाही. त्यामुळे हल्लीच्या मुलींना कामाची सवय नसते, संसारात मुरायला वेळ लागतो हि बाब त्याच्या लक्षात येईना. त्याच्या मते मुलींना हे सगळ जमलेच पाहिजे. एकदा बोलता बोलता तो तिला बराच बोलला, “आता तू एक अल्लड मुलगी राहिलेली नाहीस. एक संसारी बाई झाली आहेस. तुझ्या आईने तुला इतक्या साध्या गोष्टी शिकवल्या नाहीत? माझी आई नाही का करत? सगळ्या बायका हे नीट करतात. मग तुला ह्या सध्या सोप्या गोष्टी का जमू नये ?” हे सगळ ऐकून स्पृहा वैतागली. मुळात तिचा स्वभाव काही ऐकून घ्यायचा नव्हता. त्यात ती सगळ करायचा प्रयत्न करत होती पण तिला तिचाच जवळचा मित्र, प्रियकर सारंग ह्यानेच समजून घेऊ नये? आधीचा सारंग हाच का असा तिला प्रश्न पडायला लागला. तिच्या मनाला ह्या गोष्टी फार लागल्या. आणि एक दिवस तिच्या संयमाचा बांध फुटला. एक दिवस सारंग ऑफिस मधून घरी आल्यावर म्हणाला उद्या शनिवार आहे. आपल्या दोघांनाही सुट्टी आहे. उद्या काहीतरी स्पेशल बनवतेस का? मस्त भरली वांगी आणि मसालेभात कर. आई करते तसा! झालं!” स्पृहाला राग आला. इतके दिवस साठलेलं सगळ बाहेर पडल. “मी कशाला करू? तुझ्या आईलाच सांग न कुरियर करायला. नाहीतर एक काम कर. जा तुझ्या आईकडे आणि खा मनसोक्त काय खायचं ते. नाहीतरी मी काही केलेलं तुला काही पटत नाही,आणि आवडतही नाही. मी कशाला माझी एनर्जी वाया घालवू मग ?” स्पृहा हे आणि असं बराच काही बोलली. त्यावर सारंगचाही पार चढला. आणि त्याचं पर्यावसान कडाक्याच्या भांडणात झालं. आणि हे असं भांडण हळू हळू छोट्या छोट्या कारणांवरून दर दोन तीन दिवसांनी होऊ लागलं. अशातच स्पृहाची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी निदान केल कि स्पृहा आणि सारंग आई बाबा होणार आहेत. स्पृहाला वाटलं आता तरी भांडणं’ कमी होतील. तशी ती मी झालीही आणि स्पृहाने एका गोड मुलीला जन्म दिला. बाळाच नाव हौसेनी सानिका ठेवल. आईकडून बंगलोर ला परत आल्यावर स्पृहाने नोकरी सोडायचा निर्णय घेतला कारण बाळाला डे केअर मध्ये ठेवून तिला बाळाची आबाळ करायची तिची इच्छा नव्हती. स्पृहाने तिचे संपूर्ण लक्ष आता फक्त सानिका वर केंद्रित केले. सानिकाचं सगळ करण्यात तिचा सगळा दिवस निघून जात असे. सुरुवातीला स्पृहाला हे हि रुटीन आवडले. पण सानिका दोन वर्षाची झाल्यावर स्पृहाला घरात बसून डिप्रेशन येऊ लागले. आई वडिलांखेरीज इतर कुणावरही तिला आर्थिक दृष्ट्या अवलंबून असण्याची सवय नव्हती. पण नोकरी सोडल्यापासून सारंग कडे पैसे मागताना तिलाच गिल्टी वाटू लागले आणि ह्याचाही तिला मानसिक त्रास होऊ लागला. इकडे सारंग सुद्धा स्पृहाशी पूर्वीसारखा न वागता, तिला समजून न घेता तिच्याकडून सतत आदर्श आई, आदर्श बायको आदर्श सून होण्याची अपेक्षा करायचा. दिवसभर सानिका मागे तिची दमछाक झाल्यावर ऑफिस मधून आल्यावर तरी त्याने सानिकाला बघावे व तिला थोडा मोकळा वेळ द्यावा अशी स्पृहाची अपेक्षा होती. तिने अनेक वेळा सारंग ला असे बोलूनहि दाखवले.पण सारंग ला वाटायचे कि “मी दिवसभर ऑफिस मधून काम करून थकून घरी येतो. तर हिची अपेक्षा मी घरी आल्यावरही काम करावं ? हि दिवसभर घरीच असते आरामात आणि तरी हिला स्वतःसाठी वेळ पाहिजे? काय तीर मारणार आहे हि असा?” हा सगळा विचार करून सारंगची चिडचिड होऊ लागली. इकडे स्पृहा ला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळायचा नाही. दिवसभर दमल्यावर सानिकाने काही कारणाने रात्री सुद्धा जागवलं कि हिची अपेक्षा असायची सारंग ने सुद्धा थोड्यावेळ सानिकाला बघावे. आणि सारंग ला वाटायचे कि हि दिवसभर घरीच असते, मी ऑफिस मध्ये कामात असतो , दमतो तरी रात्रीहि मी जागावं अशी कशी अपेक्षा करू शकते हि? दोघांच्याही एकमेकांबद्दलच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे हळू हळू दोघातला दुरावा वाढत गेला. घरी आल्यावर हि सारखी कम्प्लेंटच सांगते असा विचार करून सारंग स्पृहाशी घरात संवाद साधेनासा झाला. घरी आल्यावर स्वत:च्या सोयीने सानिकाशी खेळायचं, जेवायचं, झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी परत उठून स्वतःचं आवरून ऑफिस ला जायचं. सुट्टीच्या दिवशी आराम करायचा आणि बाहेरची काही कामं करायची. हे इतकच सारंगच आयुष्य होतं. त्याच्या आयुष्यात त्याने स्पृहाला कुठल्याही प्रकारे जागा ठेवली नव्हती. सानिकासाठी जीव सुद्धा काढून देईल असं त्याच बापाचं प्रेम होतं. पण बाप होण्यासोबतच तो एक नवराही आहे हे तो विसरत चालला होता. सारंग आपल्याशी पूर्वीसारखा वागत नाही, आपल्याला टाळतो, कामापुरतच बोलतो. आपल्याशी बोलत नाही ,आपल्याला साध कशी आहेस हे हि विचारत नाही , त्याला आपल्या कुठल्याही कामाची किंमत नाही, सतत चुकाच दिसतात. सतत मी कशी वाईट आहे हेच सांगत असतो ह्या विचारांनी स्पृहाला आणखी डिप्रेशन येऊ लागलं. तिची छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड होऊ लागली आणि राग कधी कधी बिचार्या छोट्या सानिकावर निघू लागला. कुणाशी शेअर करावं म्हटल तर नवीन शहरात आणि काही महिन्यांच्या नोकरीत अशी जवळची मैत्रीसुद्धा कुणाशी झाली नव्हती. घरी आई बाबांना टेन्शन नको म्हणून ती त्यांनाही काही सांगत नव्हती. तिला कळत होतं कि सानिकावर राग काढणं चुकीचं आहे. आपण हे सगळं सारंगशीच नीट बोलायला हवं. तस तिने त्याचा मूड बघून बोलायचा प्रयत्न केलासुद्धा. पण सारंगच म्हणणं “ स्पृहा , तुझ्या स्वभावातच प्रॉब्लेम आहे. तू तुझा स्वभाव बदल. म्हणजे सगळ नीट होईल. आणि घरातल करतेस म्हणजे माझ्यावर उपकार करत नाहीस. माझ्या आईनेसुद्धा हेच केलं आणि जगातल्या सगळ्या बायकासुद्धा हेच करतात. त्यात काय एवढं विशेष?” हे ऐकून स्पृहा रात्रभर रडत राहिली आणि सारंगला गाढ झोपलेलं पाहून तिच्या मनात त्याच्याविषयी चीड उत्पन्न झाली. सारंगला आपल्याविषयी काहीच वाटत नाही आणि ह्या घरात आपली काहीच किंमत नाही ह्या विचारांनी स्पृहाला घेरलं. तिच्या मनात नको नको ते नकारात्मक विचार यायला लागले. पण सानिकामध्ये तिचा जीव अडकलेला असल्यामुळे तीच मन टोकाची भूमिका घ्याला धजावत नव्ह्तं. एकदा अशीच उदास बसलेली असताना सानिकाला तिच्या जुन्या मैत्रिणीचा नेत्राचा फोन आला. आणि स्पृहाच्या बोलण्यावरून, तिच्या आवाजावरून नेत्रा ला जाणवलं कि काही तरी प्रॉब्लेम आहे. म्हणून तिने स्पृहा ला खोदून खोदून विचारला आणि स्पृहाचा बांध फुटला. एक तास भर ती हमसून हमसून रडत होती आणि मनात इतक्या दिवसाचं साठलेल्या दुःखाचा निचरा करत होती. शेवटी शांत होऊन तिने फोन ठेवला. त्या दिवशी स्पृहा जरा शांतपणे झोपली. पण इकडे नेत्राला तिची खूप काळजी वाटू लागली. रागाच्या भरात आणि डिप्रेशन मध्ये हिने काही वेडं वाकडं पाउल उचललं तर? ह्या कल्पनेनीच नेत्रा अस्वस्थ झाली. दुसऱ्या दिवशी परत तिने स्पृहाला फोन केला आणि बजावलं कि काहीही झालं तरी ती टोकाचं पाउल उचलणार नाही. तिने स्पृहाला सल्ला दिला कि तिने एखाद्या कौन्सिलर कडे जावं. ते नक्की काहीतरी मदत करू शकतील. स्पृहाला तिचं म्हणणं पटलं. तिने लगेच एका चांगल्या कौन्सिलर चा नंबर शोधून appointment घेतली. प्रश्न हा होता कि सारंग ला कसे पटवून द्यायचे. तिने सारंग घरी आल्यावर मनाचा हिय्या करून त्याच्यापुढे हा विषय अतिशय शांतपणे मांडला. त्याने तिचे बोलणे काही सिरीयसली घेतले नाही. उलट तिच्याच स्वभावाला दोष देऊन तिच्याच चुका दाखवून त्यावर , “तिसरा माणूस तुझी काय मदत करणार आहे जोवर तू सुधारत नाहीस तोवर काही होऊ शकत नाही” असं बोलला. आता मात्र स्पृहा चा संयम संपला. तिने त्याला शांतपणे विचारले, “तुझा माझ्यातला इंटरेस्ट संपलाय का? बाहेर कोणी दुसरी मुलगी आवडायला लागलीये का? तसं असेल तर स्पष्ट सांग. मी माझ्या मुलीला घेऊन निघून जाईन. पण माझं आयुष्य असं बरबाद करण्याचा तुला काहीही हक्क नाहीये. हे असं आयुष्य मी जगू शकत नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये कि तू मला त्याची इतकी मोठी शिक्षा द्यावी. तुला जर हे नातं टिकवायची इच्छा असेल तर तू उद्या माझ्यासोबत कौन्सिलर कडे येशील. नाही आलास तर मी इथून निघून जाईन. कुठे जाईन ते तुला काय कोणालाही सांगणार नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणाला होतास म्हणून तुझ्याशी लग्न केलं मी! ह्याला जर प्रेम म्हणत असतील तर जगात कोणीही कोणावर प्रेम करू नये. तू रात्रभर विचार कर. सकाळी काय ते मला सांग.” असं म्हणून स्पृहा सानिका ला घेऊन झोपली. सारंगला ने विचार केला, “हि नेहमीसारखी बडबड करून झोपलीये , सकाळी होईल सगळ नॉर्मल. कशाचा इतका प्रॉब्लेम झालाय हिला काही कळत नाहीये. उगाच इश्यू क्रीएट करतेय. रिकाम्या डोक्याला काही काम नाही म्हणून विचित्र विचार करत बसलीये. काय नवीन खूळ काढलय कौन्सिलरचं काय माहित!” असा विचार करून स्पृहाचं बोलणं अजिबात सिरीयसली न घेता सारंगही झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर स्पृहाने परत त्याला थंड स्वरात विचारले. “काय ठरलं तुझं?” सारंग ने तिला म्हटल ,” काय एक एक खूळ डोक्यात घेऊन बसली आहेस? सोड ना आता! काय इतका इश्यू करतेयस?” स्पृहाला हे नवीन नव्हत. खरं तर तिला माहित होतच कि सारंगची हीच reaction असेल. म्हणून तिने परत क्लीअर केलं. “ सारंग , तुला जर माझी आणि आपली नात्याची पर्वा असेल तर विचार कर. हवं तर आज संध्याकाळपर्यंत वेळ घे. आणि संध्याकाळपर्यंत मला निर्णय सांग. इतके दिवस थांबलेय तर आज संध्याकाळपर्यंत थांबणं जड नाही मला. पण आज मला तुझा निर्णय नक्की हवाय कारण ह्यापुढे माझ्या आयुष्यातला एकही दिवस मला असा घालवायचा नाहीये. पूर्ण आयुष्य रडत आणि मन मारत जगणं आता मला जमणार नाही.” स्पृहाने शांतपणे सारंग ला सांगितलं. स्पृहाचं हे रूप सारंग साठी नवीन होतं. त्याला लक्षात आलं कि स्पृहाने नक्की काहीतरी मनाशी पक्क ठरवलंय. तो स्वत:च्या वागण्याचा विचार करू लागला. खरच काही चुकतंय का आपलं? ह्याच विचारात तो ऑफिस ला गेला. ऑफिस मध्ये सुद्धा त्याचं आज कामात लक्ष नव्हत. ऑफिस मधील बाकी लोक आज चॉकलेटडे साजरा करत होते . पण ह्याच कशातच लक्ष नव्हत. अचानक त्याला ऑफिस मधल्या त्याच्या मित्राने आरवने चॉकलेटदिलं व म्हणाला ,”क्या सारंग भाई.. आज कुछ खोये खोये लाग रहे हो! काही भाभी के साथ valentine’s day कहि जाने का प्लान तो नहि बना रहे? चलो कोई नही. Happy chocolate day.. आप लगे रहो अपनी खयालो कि दुनिया में! हम चलते है ! “ आरव ने दिलेलं चॉकलेटपाहून सारंग ला अचानक आठवलं कि स्पृहाला सुद्धा चॉकलेटकिती आवडतं! कित्येक वर्षात आपण तिला चॉकलेटसुद्धा दिलं नाही. आपण खरंच तिच्या आवडी निवडी विसरत चाललोय का? खरंच आपण ती म्हणतेय तस तिला गृहीत धरून इग्नोर करतोय का? आज चॉकलेटडे.. पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तिला मी प्रपोज केलं होतं आणि आयुष्य एकत्र घालवायच वचन दिलं होतं. आणि आज काय परिस्थिती आहे?” सारंग च्या डोक्यात विचारांचा नुसता गुंता झाला होता. काय करावं काय करू नये ह्याचं त्याला प्रचंड टेन्शन आलं. आणि तेवढ्यात त्याच्या मित्राने लंच साठी त्याला हाक मारली आणि सारंग ची तंद्री भंगली. डबा उघडल्यावर त्याला लक्षात आलं आज स्पृहाने वांग्याची भाजी दिलीये. त्याला आवडते तशी. सारंग ला गिल्टी वाटू लागलं. त्याचं जेवणात सुद्धा लक्ष लागेना! त्याने स्पृहाला फोन केला. त्याला काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्याने फक्त “सानू शाळेतून आली का आणि काय करतेय हे विचारलं.” स्पृहाने एका वाक्यात उत्तर दिलं. “हो. आलीये. जेवून झोपलीये. अजून काही? “ आणि सारंगने शेवटी विचारलं ,” आज संध्याकाळी किती वाजता जायचंय ?” स्पृहाला तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. पण तरी तिने “सात वाजता बोलावलंय!” सारंग म्हणाला, “ठीक आहे. मी सहा पर्यंत घरी पोचतो. तयार राहा.” ह्यावर कंठ दाटून आलेली स्पृहा इतकाच म्हणू शकली ,” थॅंक यू वेरी मच सारंग”.. फोन ठेवून सारंग कधी घरी येतो ह्याची स्पृहा वाट बघू लागली. इकडे सारंगचाही ऑफिस मध्ये वेळ जात नव्हता. त्याने काहीतरी विचार केला आणि चार दिवस सुट्टीसाठी अप्लाय केले. बॉस कडून लगेच सुट्टी मंजूरदेखील करून घेतली व आपल्या ट्रॅवेल एजंट मित्राकडून इमर्जन्सी मध्ये काही बुकिंग्स करून घेतली. ऑफिस मधून घरी येताना तो नाक्यावरच्या दुकानात थांबायला विसरला नाही. तिकडून स्पृहाच्या आवडीच्या चॉकलेटस चा बॉक्स घेतला. आणि घरी गेल्या गेल्या त्याने तो बॉक्स तिला दिला आणि म्हणाला, “हॅपी चॉकलेटस डे डियर”.. तिने हि तो बॉक्स स्वीकारून त्याला गोड अशी स्माईल दिली. तिला दुसरं काय हवं होतं म्हणा? आपल्या नवर्याकडून, आपल्या जवळच्या मित्राकडून थोडं प्रेम , थोडी काळजी, थोडं अटेन्शन.. इतकच हवं होतं तिला. ठरल्याप्रमाणे दोघेही कौन्सिलर कडे गेले. जो प्रॉब्लेम होता तो कौन्सिलरच्या मदतीने सोडवायचा प्रयत्न करायचे ठरवले. कौन्सिलर कडून आल्यावर सारंगने स्पृहाला चार दिवस गोवा ट्रीपचं सरप्राईज दिलं. दोघांनीही ह्या ट्रीप मध्ये फक्त एकमेकांना वेळ देऊन मागच सगळ विसरून नव्याने पुढचं आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि आई बाप झालो असलो तरी आपण नवरा बायकोही आहोत हे न विसरण्याचा दोघांनीही धडा घेतला.