Wednesday, June 29, 2016
के दिल अभी भरा नही..
“अभी ना जाओ छोडकर ...के दिल अभी भरा नही...” निर्जराचे सख्खे शेजारी, देशपांडे काका चप्पल घालता घालता छान गुणगुणत होते. लिफ्ट कडे जाता जाता ते सहज तिच्या घरात डोकावले. “काय निर्जरा , आलीस होय ऑफिस मधून?” काकांनी सहज चौकशी केली. रोज करतात तशीच.. तिनेही हि हसून उत्तर दिले. “हे काय आत्ताच आले. पण तुम्ही पार्टी बिर्टी ला चाललात कि काय? इतके छान तयार होऊन निघालात म्हणून विचारलं!” तिने हि नेहमीसारखं विचारलं. “छे गं ! पार्टी बिर्टी काही नाही. ते नवीन नाटक आलय ना ‘दिल अभी भरा नही’ ते बघायला जातोय मित्रांबरोबर. राघव ने मस्त पहिल्या रांगेतली तिकिटं अधून आणलीयेत आमच्यासाठी आणि फार आग्रह केला कि आजोबा, हे नाटक बघाच एकदा, म्हणून जातोय गं, तेवढाच विरंगुळा!” आजोबा म्हणाले आणि पटकन गेले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा आजोबांचा इतका सळसळता उत्साह पाहून तिलाच छान वाटलं. ती आत वळणार इतक्यात निर्जराचा नवरा रेयांश आला आणि घरात शिरता शिरता म्हणाला, “ ह्या देशपांडे आजोबांची पण कमाल आहे हा! ऐंशी वर्षाचे झाले पण म्हणे ‘दिल अभी भरा नही’ . अजून चाललेत नाटकं बघायला सूट बूट घालून! “ “अरे तुला काय करायचंय? जाउदे ना त्यांना! तू जा फ्रेश हो आणि चल चहा घे! ” निर्जरा वैतागून म्हणाली. ती दार लावणार इतक्यात तिला देशपांडे आजी दिसल्या.. डोळ्यात पाणी होते त्यांच्या! “बहुतेक रेयांशचं बोलणं ऐकलं त्यांनी! आता उद्या समजूत काढावी लागेल आजींची! ह्या रेयांशला कळतच नाही कुठे काय बोलावं ते! काय गरज होती असं बोलायची? “ असा विचार निर्जरा करत होती आणि आजींना बघून कसंनुस हसून तिने दार लावून घेतलं.
दुसर्या दिवशी संध्याकाळी निर्जरा जरा लवकरच आली. आली ते आजींशी बोलायचं हा निर्धार करूनच! तिने छान चहा केला आणि आजींना हाक मारली. तिला माहित होतं, संध्याकाळच्या वेळी अर्धा पाऊण तास एकट्याच असतात. “आजी येता का चहा घ्यायला? तेवढीच मला कंपनी मिळेल. नाहीतरी रेयांश आज उशिरा येणार आहे.” चहाच्या निमित्ताने निर्जराने आजींना घरी बोलावले. “आले हं! जरा देवाला दिवा लाऊन येते!” आजी येते म्हणाल्या तेव्हा निर्जराचा जीव भांड्यात पडला. कालच्या प्रकाराने आजी रागावल्या तर नसतील ना अशी तिच्या मनात धाकधूक होती. आजी तश्या प्रेमळ होत्या आणि निर्जराला सुद्धा कोणालाही दुखावणे आवडत नसे. म्हणून झाला प्रकार त्यांनी फार मनाला लावून घेतला नसावा असे निर्जराला वाटले. निर्जरा ने दोन कपांमध्ये चहा ओतला , जोडीला छान बिस्किटं प्लेट मध्ये रचून ठेवली तेवढ्यात आजी आल्याच.
दोघी एकत्र डायनिंग टेबल वर बसून चहा घेऊ लागल्या. “छान झालाय हं चहा..बरं झालं बाई तू आज चहाला बोलावलंस ते.. नाहीतर ही संध्याकाळ ची वेळ अगदी नकोशी वाटते ग घरात एकटीला. घरात सगळं छान असूनसुद्धा हे कातरवेळ हुरहूर लावते बघ जीवाला.” आजी म्हणाल्या. “आजी, हेही तुमचच घर आहे. या कि रोज चहाला. मलाही छान वाटेल.” निर्जरा म्हणाली. “आजी ..एक विचारू का? काल रेयांश जे आजोबांविषयी बोलला ते ऐकून तुम्हाला वाईट वाटलं असेल ना! खरं तर त्याच साठी मी आज तुम्हाला त्याच्या वतीने सॉरी म्हणायला म्हणून मुद्दामच बोलावले. त्याच्या मनात तसं काहीच नव्हत हो! आपला सहज परिणामांचा विचार न करता बोलून गेला तो! माफ करा आजी त्याला! मला माहितेय तुम्हाला खूप वाईट वाटले असणार. पण तरी तुमचा नातू समजून त्याला माफ करा.” निर्जरा कळकळीने बोलली. “निर्जरा अगं इतकी माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही.. मला जसा राघव तसाच रेयांश. तू वाईट वाटून घेऊ नकोस. काल रेयांश चे बोलणे ऐकून मला वाईट वाटले होते पण ते तेवढ्यापुरतेच. नंतर मी तो विषयच सोडून दिला.. अगं तुम्हा तरुण मुलांच्या मनात हे येणेही अगदी साहजिक आहे कि संपूर्ण आयुष्य गेल्यावर आता म्हातारपणी कशाला बाहेर फिरायचं? नाहीतरी आपल्याकडे पूर्वीपासून अशीच मानासिकता आहे की म्हातारपणी आपापल्या खोलीत बसावं ,जगापासून अलिप्त राहावं आणि मरणाची वाट बघत हरी हरी करावं. पण ज्याच्यावर वेळ येते ना, त्यांच्यासाठी हे खूप कठीण असतं गं!” आजी पोटतिडकीने मन मोकळं करत होत्या आणि निर्जरा मन लावून आजींचे बोलणे ऐकत होती.
“अगं आम्ही सुद्धा आधी ह्याच मानसिकतेचे होतो. एका विशिष्ट वयानंतर सणासुदीला नवीन कपडे घेणं , बाहेर येण जाणं कमी केलं होतं , सगळ्यातून अलिप्त राहू असच ठरवलं होतं. अरुण आणि कल्याणी अगदी प्रेमाने आमचं सगळं करत होते . आम्हाला हवं नको ते सगळं छान बघतात ती दोघं, नातवंड म्हणजे तर अगदी आमचे जणू मित्रच होते नि आहेत. तरी आमच्यासाठी त्यांनी आपापली कामे का सोडायची? त्यांनाही त्यांचं आयुष्य आहेच कि! मुलं आपापल्या व्यापात असतात नि मोठ्या शहरात नोकरीच्या ठिकाणाहून परत यायलाही उशीर होतो. अशावेळी संध्याकाळची वेळ अगदी आम्हाला दोघांना नको वाटायची. हुरहूर लागायची जीवाला. हे तर अगदी खचल्यासारखे दिसायचे आणि माझ्या डोळ्यात का कुणास ठावूक पाणी यायचं. शेवटी आमच्या मुलांनाच आमचं हे अलिप्त वागणं आणि आमची मानसिक अवस्था बघवली नाही आणि एक दिवस त्यांनी आम्हाला समोर बसवून विचारलच कि त्यांचं काही चुकतंय का ! आम्हाला का इतका त्रास होतोय! आम्हालाही कारण कळेना गं! आणि त्यांनी आमचं कौन्सिलिंग का काय म्हणतात तेच केलं! आणि आम्हा दोघांनाही त्यांचं बोलणं पटलं कि म्हातारे झालो म्हणून सकारात्मक राहणं का सोडायचं? छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणं का बंद करायचं? ह्या वयाला हे शोभत नाही, ते करणं चांगलं दिसतं का ह्या समाजाच्या बंधनात का अडकवून घ्यायचं स्वतःला? कशासाठी म्हातारपणाला शाप समजून नकारात्मक विचारात मृत्यूची वाट बघत दिवस ढकलायचे? उलट देवाने इतकं छान बोनस आयुष्य दिलाय ते आनंदात जगायचं. छान आवडी निवडी , छंद जोपासायचे! नवीन पिढीशी, त्यांच्या तंत्रज्ञानाशी ओळख करून घ्यायची, त्यांच्यात सामील व्हायचं म्हणजे सकारात्मकता वाढायला मदत होते. सूर्यास्ताची जर हुरहूर वाटते तर त्या सुर्यास्ताच्याच वेळी छान आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ व्यतीत केला तर कशाला हुरहूर वाटेल? हो कि नाही? म्हणूनच संध्याकाळी हे त्यांच्या मित्रांच्यात वेळ घालवतात आणि आनंदी राहत्तात आणि ह्यांना असं उत्साही बघून मीही मुला सुनांच्या आवडीचे पदार्थ करण्यात वेळ घालवते. थोडं वाचन करते, मनाला वाटेल ते करते. बरोबर कि नाही? बघ बोलत काय बसले मी! आज मस्त शेवपुरी करणार आहे घरी, त्याची तयारी करायची आहे. आमच्या कल्याणीला फार आवडते .तुलाही आवडत असेल ना? झाली कि हाक मारते हो तुलाही..चल येते मी.” असं म्हणत आजी उठल्या. “हो आजी ..नक्की हाक मारा मला.. मी येईन मस्त शेवपुरी एन्जॉय करायला! “ निर्जरा म्हणाली. तिला आजी आजोबांचे त्यांच्या सकारात्मकतेबद्दल खूप कौतुक वाटत होते आणि आजी रागावल्या नाहीत हे ऐकून हायसे आणि मोकळेही वाटत होते.
वैदेही राजे- जोशी
Thursday, June 16, 2016
आणि नर्मदा बोलावत होती.
रात्रीचे दोन वाजले आणि कावेरी आजींना जाग आली. परत डोळा लागेना म्हणून पाणी प्यायला उठल्या. बघतात तर काय नरेश , त्यांचा नातू , त्याच्या बिछान्या वर नव्हता. आजींच्या काळजात धस्स झाले. घरात सगळीकडे त्यांनी शोधले पण नरेश कुठेही दिसत नव्हता. त्यांनी घाई घाईने त्यांच्या नवर्याला म्हणजेच सुधाकर रावांना उठवले. "अहो.. अहो उठा ना.. बघा ना आपला नरेश परत दिसत नाहीये. कुठे गेला बघा ना.. अहो झोपलात काय? उठा आणि शोधा त्याला." आजी जिवाच्या आकांताने आजोबांना उठवत होत्या. आजोबा ताडकन उठून बसले. "काय गं काय झाले? इतकी का घाबरलियेस तू? " आजोबांनी आजीला विचारले. "अहो घाबरू नको तर काय करू! आपला नरेश कुठेतरी निघून गेलाय रात्रीचा! बघा ना.. शोधून आणा ना त्याला. अहो तिकडे नदीवर तर गेला नसेल ना? काय करायचे आपण आता? अहो बोलावा ना कुणालातरी.. आणा ना त्याला शोधून.." आजी आता रडायला लागल्या होत्या. " अगं पण आपण इतकी काळजी घेऊन परत असं कसं झालं? आता त्याच्या बापाला काय तोंड दाखवणार आपण?" आजोबा कपाळावर हात मारून मटकन खाली बसले. "अहो बसलात काय? उठा ना.. आणा त्याला शोधून. तुम्हाला मेलं वेळेवर काही करायच सुचत नाही. मीच बघायला हवं आता." अस म्हणून पदर खोचून ओसरीवर येऊन आजींनी त्यांच्या नोकराला गणूला हाक मारली.
वयाच्या ऐंशिव्या वर्षी सुद्धा आजी खमक्या होत्या. पण आजोबा मात्र आता थकले होते. "गणू ए गण्या .. अरे ए गणू.." आजींनी गणूला आवाज दिला तसा गणू धावत पळत ओसरीवर आला. "काय झाल वैनीबाई? कशापाई रातीचा आवाज देतया? मालक बरे हाइती नं वं? " "अरे गणू नरेश घरात नाहीए. रात्री झोपताना नीट होता. रात्रीचा कुठे जाउ नकोस म्हणून त्याला बजावले देखील होते. सगळी दारं खिडक्या कुलुपबंद करून त्याला झोपवले होते रे..पण आता बघ ना अचानक कुठे नाहीसा झाला कळतच नाहीए. जा जरा बघून ये परत नदिपाशी नाही ना गेलं माझं लेकरू!! जा आणि त्याला घेतल्याविना परत येऊ नकोस." आजींनी फर्मान सोडले. "व्हय वैनिबाई..आत्ता आणतो बघा धाकल्या मालकास्नी हुडकून..तुमि कायबी काळजी करू नगसा..” अस म्हणत गणू नरेश ला शोधायला गेला. इकडे कावेरी बाईंनी दारात भांडं उपड घालू ठेवल आणि त्या देवाचा धावा करत बसल्या. पण त्याचं लक्ष लागतय कुठे! “काय गं.. इथे काय दाराशी बसलीयेस? गणू ला सांगितलस ना नरेश ला शोधायला? येईल बघ तो.. तू आत चाल बरं!” आजोबांच्या ह्या बोलण्याने आजी भानावर आल्या. “ हं! हो! येते!” असं म्हणून आजी आत आल्या खर्या पण मनातून त्या खूप अस्वस्थ व घाबरलेल्या होत्या. “अहो! गिरीजा नसेल ना घेऊन गेली त्याला?” असं हळू आवाजात आजोबांना म्हणाल्या.
गिरीजाचं नाव काढल्याबरोबर आजोबा सुद्धा घाबरले. पण उसनं अवसान आणून म्हणाले. “नाही गं! असं कुठे असतं का? ती गेली त्याला २५ वर्ष झालीत आता. इतक्या वर्षांनी कशाला असं काही होईल? असं काही नसतं ! तू उगाच नसत्या शंका काढून जीवाला घोर लावू नकोस.” आजोबा असं म्हणाले खरे पण त्यांनाही तीच भीती वाटत होती जी आजींना वाटत होती. गिरीजा म्हणजे कावेरीबाई व सुधाकर राव ह्यांच्या एकुलत्या एक मुलाची म्हणजेच राजेंद्रची बायको. एकदम शांत , गुणी व सालस मुलगी. एखाद्याला सून म्हणून व बायको म्हणून हवी असे तशीच होती गिरीजा. लग्न करून सासरी येताच तिने तिच्या स्वभावाने व गुणांमुळे सर्वांचे मन जिंकले. पण कुणाची तरी दृष्ट लागली आणि गिरीजाचे आयुष्य उध्वस्त झाले.लग्नाला ५ वर्ष झाली तरी गिरीजाकडे गोड बातमी नव्हती. छोट्या गावात राहणार्या ह्या कुटुंबाला हि गोष्ट म्हणजे गिरीजाचा घोर अपराध वाटू लागला. सर्वांचे गिरीजाशी वागणे बदलले. अगदी राजेंद्रचे सुद्धा! त्यालाही ती डोळ्यापुढे नको असायची. पण गिरीजा मात्र शांतपणे नशिबाचे भोग म्हणून हे सगळं सहन करत होती. टोमणे ऐकून घेणं, कुजकट बोलणी ऐकणं , शुभ कार्यात तिला न बोलवणे हे तिच्यासाठी नित्याचेच झाले होते. पण जेव्हा तिला कळले कि तिच्या सासरचे राजेंद्रचे फक्त वंशाच्या दिव्याच्या अट्टाहासापायी दुसरे लग्न लावून देत आहेत तेव्हा तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि तिने सर्व शक्तीनिशी ह्याचा विरोध केला. पण तिचे प्रयत्न तोकडे पडले आणि राजेन्द्र्चा दुसरा विवाह लावून देण्यात आला. ज्या दिवशी गिरीजाची सवत घरात आली त्याच दिवशी सासरच्यांनी गिरिजाला कायमचे माहेरी निघून जाण्यास सांगितले. गिरीजा मानी होती. ती माहेरी गेली नाही. घरातून तर ती बाहेर पडली. पण जाता जाता संध्याकाळच्या वेळी ती म्हणाली. “ज्या वंश्याच्या दिव्याखातर तुम्ही घराच्या लक्ष्मी ला बाहेर काढत आहात, त्याच वंशाच्या दिव्याला एक दिवस मी घेऊन जाईन. हा माझा शब्द आहे. “ ती घराबाहेर पडली आणि नंतर कुणाला सापडलीच नाही. गावातल्या काही लोकांनी तिला गावाबाहेर जो नर्मदेचा प्रवाह वाहत होता तिकडे जाताना पाहिले ते शेवटचेच. नंतर तिचे प्रेतही सापडले नाही. इकडे राजेंद्र आणि त्याचे घरचे ब्याद गेली म्हणून निश्चिंत होते. पण कावेरीआजी मात्र धास्तावलेल्या असायच्या. उगाच बोला फुलाला गाठ नको म्हणून त्यांनी राजेंद्र ला नोकरीसाठी शहरात पाठवून दिले व नरेश च्या जन्मानंतर त्याला बजावले कि चुकून सुद्धा गावात यायचे नाही. उलट आम्हाला आठवण आली कि आम्हीच शहरात येऊन तुमची भेट घेऊ.
आणि आज तब्बल २५ वर्षांनंतर नरेश एकटाच गावाला आला होता. त्याने त्याचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाबांकडे हट्ट केला होता कि मला एकदाच गावाला जाऊन येऊ द्या. फक्त दोन दिवस! मुलाचे मन बापाच्याने मोडवेना म्हणून राजेंद्र ने नरेश ला आजी आजोबांकडे पाठवले ,पण बाजावूनच कि आजी आजोबा सांगतील तसच वागायचं , उगाच गावात इकडे तिकडे अनोळखी ठिकाणी भटकायला जायचे नाही. नरेश ने बाबांना वचन दिले कि तो त्यांना काळजी वाटेल असे काहीही करणार नाही. आणि तो बस ने गावाला यायला निघाला. गावाला पोचल्यावर रिक्षा वगैरे च्या भानगडीत न पडता त्याने गाव बघायला मिळेल म्हणून सरळ चालत घरी जायचा निर्णय घेतला. घराकडे जात असताना का कुणास ठाऊक पण कुठल्याश्या अनामिक ओढीने तो नदीच्या प्रवाहाकडे चालत जाऊ लागला. नदीच्या पात्रामध्ये पाय ठेवणार इतक्यात त्याला कुणीतरी हटकले. “ओ पाव्हनं ! तिकडं कुठं जाताय? भोवरा आहे पाण्यात! पोहायला येतं का तुम्हास्नी? उगा जीव जायचा! अन कुणाकड आलं म्हणायचं तुमी?” रामाचे बोलणे ऐकून नरेश भानावर आला आणि म्हणाला अहो मी नरेश , सुधाकर पाटलांचा नातू! आजच आलो आजी आजोबांना भेटायला!” हे ऐकून रामा म्हणाला ,”पाटलांचा व्हय रे तू! चल तुला सोडतो घरी! म्या बी तिकडच चाल्लूया !” नरेश ला घेऊन रामा पाटलांच्या घरी गेला आणि त्याने सांगितले कि नरेश कसा एकटाच नदीकडे जाताना त्याला दिसला आणि त्याने नरेश ला घरी आणून सोडले. पाटलांनी रामाचे आभार मानले आणि नरेश ला बजावले कि परत नदीच्या रस्त्याला सुद्धा जायचे नाही. त्यांना गिरीजाच्या सूडप्रतिज्ञेची आठवण झाली आणि काळजी वाटू लागली. रात्री झोपताना नरेशने परत कुठे जाऊ नये म्हणून त्यांनी कडेकोट बंदोबस्त केला तरी नरेश अचानक नाहीसा झाला होता.
“देवा आमच्या पापाची शिक्षा आमच्या पोराला देऊ नकोस”. असं म्हणत दोघेही देवाचा धावा करत बसले होते तेवढ्यात गणू नरेश ला घेऊन आला. गणू ने सांगितले कि नरेश त्याला नदीच्या रस्त्यावरून परत येताना दिसला. आजी आजोबा दोघांनीही नरेश ला चांगलेच फैलावर घेतले . पण नरेशने त्यांना सांगितले कि त्याला कळलेच नाही कि तो झोपेतून उठून चालत नदीपाशी कसा पोचला.नरेश ला काहीही आठवत नव्हते. त्याला इतकेच आठवत होते कि पायाला नदीच्या पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्याला एका अनोळखी स्त्री ने हटकले आणि परत घरी जाण्यास सांगितले. आजीने त्याला त्या स्त्रीचे वर्णन विचारले तर त्याने सांगितले कि तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती , कपाळावर मोठे कुंकू होते व चांगल्या घरची वाटत होती. त्यालाही आश्चर्य वाटत होते कि रात्रीच्या वेळी एक चागल्या घरची बाई नदीपाशी काय करत होती. तो तिला विचारणार इतक्यात ती बाई झपझप चालत नाहीशी झाली आणि हा घरी यायला निघाला इतक्यात याला गणू भेटला. चला देव पावला व नरेश सुखरूप घरी आला, संकट टळले असे म्हणत सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दुसर्या दिवशी सकाळीच आजोबांनी हि घटना राजेंद्र ला कळवली व कसलाही विचार न करता राजेंद्र एकटाच परस्पर नरेश ला परत घेऊन जायला म्हणून गावाकडे निघाला. गावी पोचल्यावर त्याने त्याच्या आई वडिलांना सांगितले कि तो नरेशला परत घेऊन जायला आला आहे.व ती दोघं उद्या सकाळी निघणार आहेत. आजी आजोबांना घडल्या प्रकारची पुनरावृत्ती व्हायला नको असेच वाटत असल्याने त्यांनीही परवानगी दिली. बर्याच वर्षांनी गावाकडे आल्याने राजेंद्र जरा निवांत होता. जरा जुन्या मित्रांना भेटून येतो असे सांगून तो घराबाहेर पडला पण मित्राच्या घराच्या दिशेने न जाता ओ कुठल्याश्या अनामिक ओढीने नदीकडे जायला निघाला. त्याला जणू नर्मदा बोलवत होती. चालत चालत नदीच्या पात्रात शिरल्यावर तो भानावर आला पण तोवर उशीर झाला होता. पट्टीच्या पोहणाऱ्या राजेंद्रला नदीत कोणी खेचतय असे वाटू लागले.त्याने बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न विफल ठरले. अखेर त्याने धडपड थांबवली आणि शेवटचे डोळे उघडून पहिले तेव्हा त्याला गिरीजा दिसली, सूडाच्या भावनेनी हसत असलेली.. त्याला ऐकू आले, आज मी मुक्त झाले.. आज मी माझा शब्द खरा ठरवला.. पाटलांच्या वंशाचा दिवा मी नेतेय! निष्पाप नरेशला जीवनदान देऊन तिने राजेंद्रला त्याच्या पापाची शिक्षा दिली होती. गिरीजा मुक्त झाली होती. राजेंद्रला नर्मदेच्या स्वाधीन करून गिरीजा मुक्त झाली होती!..
वैदेही राजे- जोशी..
Subscribe to:
Comments (Atom)