Thursday, September 8, 2016
रुणुझुणुत्या पाखरा...
रुणुझुणूत्या पाखरा , जा रे माझ्या माहेरा,
आली गौराई अंगणी तिला लिम्बलोण करा...
माझं माहेर सावली, उभी दारात माउलि
तिच्या काळजात बाई माया - ममतेचा झरा ..
आज सकाळपासून मनात सारख हेच गाण वाजतय! लग्न झाल्यापासून दर वर्षी आमच्या कडच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले कि मला वेध लागतात ते
माहेरच्या महालक्ष्म्यांचे ... दर वर्षी आई बाबा सांगतात "आम्ही महालक्ष्म्यांना जातोय " तेव्हा खुप वाटतं कि आपणही जावं, परत लहान व्हावं, सणासुदीची मजा अनुभवावी, आई- बाबा , काका काकू, दादा -वहिनी, ताई ह्यांच्याकडून लहानपणापासून केलं गेलेलं माझ pampering परत एकदा अनुभवावं !
आज रोहन (माझा दादा) म्हणाला कि मी आपलं लहानपण, महालक्ष्म्यांची मजा, माहूरची ट्रिप सगळ खूप मिस करेन तेव्हा मन भूतकाळात गेलं! दर वर्षी महालक्ष्म्यांना जाणं हि किती आनंदाची गोष्ट् असायची! आई , ताई , काकू ह्यांना फुलोरा , आरास करतांना पाहणं , महालक्ष्म्यांना वाजत गाजत आणणं , त्यांना साड्या नेसवणं , दागिने घालणं , आरास करणं , मुखवटे बसवणं हे सगळं मोठी माणसं करत असताना मध्ये मध्ये लुडबुड करणं ह्यात खूप मजा यायची. दुसऱ्या दिवशी काकू- आई ह्यांना नैवेद्याचा सोवळ्यात स्वंयपाक करताना बघून, स्वैपाकघरातून रुचकर नैवेद्याचा घमघमाट येताना बघून पोटातली भूक चाळवली जायची. मग काकूंच्या हातचा उपमा, चिवडा -लाडू असा भरपेट नाश्ता सगळे बहीण भाऊ मिळून करायचो. त्यात मन आणि पोट दोन्ही मनसोक्त भरायचं ..
मग रोहन , मी , अजित दादा ,प्रसाद दादा आणि देवी अंगणातल्या स्वस्तिकाच्या झाडाची भरपूर फुलं काढायला जायचो. वैजू ताई ,वर्षा ताई एव्हाना भरपूर फुलं घेऊन हार करायला बसलेल्या असायच्या . हार करावा तर ह्यांनीच ! मी तर हार करायला ताईंकडूनच शिकले. भरगच्चं सुंदर हार घातलेल्या महालक्ष्म्या अजूनच सुंदर दिसायच्या. मग गुरुजी येऊन छान साग्रसंगीत पूजा सांगायचे . मग सगळ्यांनी मिळून छान आरत्या म्हणायच्या, धूप फिरवायचा, काजळ धरायचं आणि ते लगेच डोळ्यात घालायचं .. आणि मग पुसदचे स्पेशल पेढे प्रसाद म्हणून मनसोक्त खायचे. मग पंगतीमध्ये आई, ताई, काकू ह्यांना छोटे , कोरडे पदार्थ वाढायला थोडी मदत करायची आणि महालक्ष्म्यांचे विडे कसे तयार करतात ते बघायचं ! ह्या सगळ्यात दुपारचे तीन चार कसे वाजायचे कळायचंच नाही. दुपारची महापूजा आणि दगदग आटोपून सगळे निवांत बसलेले असताना कधी गप्पा, कधी अंताक्षरी ह्यात दिवस संपायचा.
दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची कहाणी वाचणे, गाठी पाडणे , अष्टक म्हणणे आणि पौतं बांधून मोठ्यांना नमस्कार करणे ह्यात सकाळची दुपार व्हायची. मग संध्याकाळी आई ,काकु छान साड्या नेसून हळदी - कुंकवासाठी तयार व्हायच्या आणि मला आणि देवी ला रोहन, प्रसाद दादा , अजित दादा आम्हाला पुसद चे फेमस गणपती बघायला न्यायचे. .मोठ्या दादा लोकांना दुसरं काम असलं तरी रोहन मात्र न चुकता दर वर्षी आम्हाला नक्की गणपती बघायला न्यायचा.
असे हे महालक्ष्म्यांचे तीन दिवस हसतखेळत कसे निघून जायचे कळायचं सुद्धा नाही. परत नागपूरला निघताना मन जड व्हायचं! तसंच ते आताही झालंय! ते नुसतं feeling nostalgic असं स्टेटस ठेवून सांगता येणार नाही.
पूर्वी मुलींना सासुरवास असायचा म्हणून हे माहेरवाशिणींसाठी खास सण असायचे ,तेव्हा मुली माहेरी येऊन जरा रीलॅक्स व्हायच्या. हल्ली आम्हा मुलींचे सासरी छान लाड होतात, कोडकौतुक होतं..तरीही माहेरच्या ह्या खास आठवणीने मन का हळवं होतं ?
-वैदेही राजे - जोशी
Subscribe to:
Posts (Atom)